मुंबई : जागतिक पातळीवरील अस्थिर संकेतांनंतरही बँकिंग आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आलेल्या मागणीने गुरुवारच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने १६० अंशांची कमाई केली. परिणामी, सलग चार सत्रांत सुरू राहिलेल्या घसरणीनेही विराम घेतला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १६० अंशांची वाढ होऊन तो ६२,५७०.६८ पातळीवर बंद झाला. निर्देशांकाने सकाळी कमकुवत पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली, मात्र दिवसअखेर ठरावीक क्षेत्रातील समभागांची मागणी वाढल्याने तो सकारात्मक पातळीवर पोहोचला. निर्देशांकाने दिवसभरात ६२,६३३.५६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी १३ कंपन्यांचे समभाग तेजीत होते, तर १७ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४८.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १८,६०९.३५ पातळीवर स्थिरावला. निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, देशांतर्गत बाजाराने लक्षणीय अस्थिरता अनुभवली. त्याला जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची भीती आणि अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून होणाऱ्या दरवाढीची चिंता कारणीभूत ठरली. जागतिक पातळीवरील घसरणीमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण कंपन्यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली, मात्र बँका विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांना आलेल्या मागणीने बाजाराला सावरले. येत्या आठवडय़ात फेडरल रिझव्‍‌र्हचे पतधोरण आणि अमेरिकेतील महागाई दरासंबंधी आकडेवारी जाहीर होणार असल्याने बाजारात अस्थिरता कायम राहण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मारुती यांचे समभाग तेजीसह व्यवहार करत स्थिरावले. दुसरीकडे सन फार्माच्या समभागात सर्वाधिक ३.५७ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, टीसीएस, नेस्ले, विप्रो, कोटक बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. बुधवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,२४१.८७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.