नवी दिल्ली : भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे चित्र आहे. परिणामी, विद्यमान आर्थिक वर्षात (२०२३-२४) १९० एसएमई कंपन्यांनी सुमारे ५,५७९ कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात १२५ कंपन्यांनी ‘एसएमई आयपीओ’ मंचाच्या माध्यमातून २,२३५ कोटी रुपयांची निधी उभारणी केली होती.

विद्यमान २०२३ सालातील सूचिबद्ध एसएमई कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलाने १ लाख कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, यात नव्याने दाखल कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये ‘आयपीओ’ घेऊन येणाऱ्या एसएमई कंपन्यांच्या संख्येत दुपटीने वाढली.

हेही वाचा…सरकारी बँकांकडून केंद्राला १५,००० कोटींचा लाभांश श

उल्लेखनीय म्हणजे या छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओं’नी वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शिवाय गुंतवणूकदारांकडून कैकपटीने अधिक भरणा प्राप्त होत असल्याने सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ते बाजारात नशीब आजमावत आहेत. मोठ्या गुंतवणूकदारांनीदेखील मुख्य बाजार मंचावरील उत्साह ओसरल्याने आता ‘एसएमई आयपीओं’कडे मोर्चा वळवला आहे.

मागील वर्षाच्या आकडेवारीच्या तुलनेत, जिथे २,२३५ कोटींची उभारणी केली होती, त्यांचे सरासरी आकारमान २७ कोटी राहिले होते. ते यंदा वाढून सरासरी ३४ कोटी झाले आहे. ‘एसएमई’ कंपन्यांची वाढ आणि परताव्याची क्षमता ओळखून संस्थात्मक गुंतवणूकदारांचेदेखील वाढते स्वारस्य अधोरेखित झाले आहे. चालू वर्षातील १६६ पैकी ५१ कंपन्यांच्या समभाग विक्रीला (आयपीओ) १०० पटींहून अधिक, तर १२ कंपन्यांच्या ‘आयपीओ’ला ३०० पटींहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्याचे दलाली संस्था ‘फायर्स’च्या अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा…बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल

‘सेबी’ची करडी नजर

परताव्याचे लक्षणीय प्रमाण पाहता, सावधगिरी म्हणून बाजार नियामक ‘सेबी’ तसेच बाजारमंचांनीही सूचिबद्ध एसएमई कंपन्यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायांतर्गत (एएसएम) आणि ट्रेड फॉर ट्रेड (टीएफटी) उपायांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर हे उपाय केवळ मुख्य बाजारमंचावर सूचिबद्ध कंपन्यांपुरते सीमित होते. एसएमई कंपन्यांच्या समभाग मूल्यातील लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘एएसएम’ निर्देशांतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळतीचा निर्णय घेतला गेला. समभागांतील वध-घट, त्यातील गुंतवणूकदारांचे केंद्रीकरण, तळच्या आणि वरच्या किंमत मर्यादेपर्यंत समभाग घरंगळण्याचे प्रमाण, नजीकच्या बंद भावांमधील मोठी तफावत अशा निकषांवर हा निर्णय घेतला जातो.

हेही वाचा…भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

‘एसएमई आयपीओ’कडून परतावा किती?

‘प्राइम डेटाबेस’च्या माहितीनुसार, वर्ष २०२३-२४ सालात ‘एसएमई आयपीओ’ची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यांनी सरासरी ६७ पट अधिक प्रतिसाद अनुभवला आहे. त्यांच्यापैकी काहींना तर ७१३ पट प्रतिसाद मिळाला आहे. २०२३ मध्ये सूचिबद्ध झालेल्या १०७ एसएमई कंपन्यांच्या समभागांनी आतापर्यंत सरासरी ७७ टक्के परतावा दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही समभागांनी केवळ ४ ते ५ महिन्यांत चार पटीने परतावा मिळवून दिला आहे. १६६ पैकी केवळ १९ कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.