नवी दिल्ली : सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या हवाई सेवेचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये येत्या १२ नोव्हेंबरपासून विलीनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवार, ३ सप्टेंबरपासून, ग्राहकांना १२ नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्ताराचे तिकीट आरक्षित करता येऊ शकणार नाही.

एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे येताच ‘विस्तारा’ला विलीन करून घेण्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये परदेशी थेट गुंतवणुकीला मान्यता दिल्यानंतर हे विलीनीकरण निश्चित करण्यात आले. विलीनीकरणापश्चात हवाई सेवेचे ‘विस्तारा’ हे नाव लोप पावून, ती एअर इंडियाच्या सेवेचा भाग बनेल.

येत्या ११ नोव्हेंबरपर्यंत ‘विस्तारा’ नेहमीप्रमाणे विमान सेवा सुरू ठेवणार आहे. मात्र १२ नोव्हेंबरपासून सर्व विमाने एअर इंडियाच्या नाममुद्रेअंतर्गत सेवा देतील. तिकिटे पूर्व-आरक्षित केलेल्या ग्राहकांना या हस्तांतरणाबद्दल वैयक्तिकरित्या माहिती दिली जाणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ‘आयएफएससी’मध्ये कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी अट शिथिल

प्रस्तावित विलीनीकरण करारानुसार, या व्यवहाराचा भाग म्हणून सिंगापूर एअरलाइन्सकडून एअर इंडियामध्ये २,०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सकडे असलेल्या १७.५ अब्ज सिंगापूर डॉलरच्या राखीव निधीमधून एअर इंडियाला ही रक्कम देण्यात येईल. त्यामुळे विलीनीकरणानंतर स्थापित होणाऱ्या नवीन संयुक्त कंपनीमध्ये सिंगापूर एअरलाइन्सची २५.१ टक्के हिस्सेदारी राहील. प्रस्तावित विलीनीकरणाआधी विस्ताराच्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षापासूनच सुरू करण्यात आली होती.

सध्या टाटा समूहाकडे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या चार हवाई सेवा कंपन्यांची मालकी आहे. जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे अधिग्रहण केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान सेवेचे जाळे आणि विमानांचा ताफा दोन्हींमध्ये वाढ करण्यासह, ग्राहकसेवेत सुधारणा, सुरक्षा, विश्वासार्हता आणि वक्तशीर कामगिरी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार असून विस्तारा आणि एअर इंडियाचे विलीनीकरण अगदी सुरळीतपणे पार पडेल, असे विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन यांनी स्पष्ट केले. टाटा समूहाच्या मालकीच्या या दोन्ही कंपन्या असून, हवाई वाहतूक क्षेत्रातील वर्चस्व वाढवून, विशेषत: कमी खर्चातील हवाई सेवा ‘इंडिगो’ला टक्कर देण्याच्या दिशेने समूहाने वाटचाल सुरू केली आहे.