Stock Market News Updates: पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणावर वाढला होता. यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांसह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली होता. परिणामी गेल्या आठवड्या भारतासह पाकिस्तानचा शेअर बाजारही कोसळला होता.
दरम्यान, शनिवारी भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्यानंतर आज (सोमवारी) पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. परिणामी बाजारात मोठी उसळी आली आहे. आज मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सुमारे १३०० अंकाच्या वाढीसह उघडला होता. बाजारातील सकाळची ही तेजी कायम राहिली असून, आज सेन्सेक्स २,९७५.४३ किंवा ३.७४% टक्क्यांनी वाढून बंद झाला. जून २०२४ नंतर बाजारातील ही एका दिवसातील सर्वात मोठी तेजी होती.
याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंच्या निफ्टी ५० निर्देशांकातही मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. दुपारी ३:३० वाजता निफ्टी ५० ९१२.८० किंवा ३.८०% वाढीसह बंद झाला आहे. या दोन्ही प्रमुख निर्देशांकात आलेल्या तेजीमुळे गेल्या आठवड्यात ज्या गुंतवणूकदारांना नुकसान झाले होते, ते भरून निघाले आहे.
याचबरोबर स्वित्झर्लंडमध्ये अमेरिका आणि चीनने टॅरिफबाबत चर्चा पूर्ण केल्या असून, दोन्ही देश सकारात्मक असल्याचे समोर आल्यानंतर यूएस फ्युचर्स जवळजवळ ४०० अंकांनी वाढले आहेत. याचा आशियाई बाजारपेठांवरही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
सोन्याचे भाव घसरले
शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली असली तरी, दुसरीकडे कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज सोन्याचे भाव २,५५३ रुपये घसरून ९३,९६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, सोन्याचे दर १.४९% ने घसरले तर स्पॉट सिल्व्हर २% पेक्षा जास्त घसरले.
पाकिस्तानच्या शेअर बाजारातही उसळी
दुसरीकडे सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजने सर्किट ब्रेक केल्याचे पाहायला मिळाले. सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क केएसई-१०० निर्देशांक जवळजवळ ९% वाढला, ज्यामुळे व्यवहार एक तास थांबवण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला शस्त्रविराम आणि आयएमएफने पाकिस्तानला दिलेल्या आर्थिक पाठिंब्यानंतर शेअर बाजारातील ही वाढ दिसून आली.
गेल्या आठवड्यात संघर्षाच्या भीतीने गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली होती. त्यामुळे आठवडाभरात कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये ६% घसरण झाली होती. परंतु शस्त्रविरामाच्या निर्णयामुळे बाजार आज फक्त सावरलाच नाही तर त्याने वर्षभराचा तोटाही भरून काढला.