सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात नवा इतिहास रचला गेला आहे. निफ्टीने प्रथमच २० हजारांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स ५२७ अंकांच्या वाढीसह ६७००० अंकांच्या पुढे बंद झाला. ही वाढ होण्याचे कारण म्हणजे जी २० शिखर परिषदेत घेतलेले महत्त्वाचे निर्णय मानले जात आहेत. ज्यामध्ये भारत, अमेरिका, युरोपियन युनियन आणि आखाती देशांदरम्यान रेल्वे आणि सागरी कॉरिडॉरबाबत झालेल्या कराराचा विचार केला जात आहे. याचे कारण विशेषत: रेल्वेशी संबंधित PSU शेअर्समध्ये वाढ झाल्याचे मानले जाते. दुसरीकडे बँकिंग आणि वाहन समभागातही तेजी दिसून आली आहे.

सेन्सेक्सने ६७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला

मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आज ६७ हजार अंकांच्या पुढे बंद झाला. आज निर्देशांकात ५०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सेक्स ५२८ अंकांच्या वाढीसह ६७,१२७.०८ अंकांवर बंद झाला. ५२ दिवसांनंतर सेन्सेक्सने ६७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. २१ जुलै रोजी सेन्सेक्स ६७१९० अंकांसह दिवसाच्या उच्चांकावर दिसला होता. जर फक्त सप्टेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास सेन्सेक्समध्ये सुमारे २३०० अंकांची म्हणजेच साडेतीन टक्क्यांची वाढ झाली आहे. ३१ ऑगस्ट रोजी सेन्सेक्स ६४,८३१ अंकांवर बंद झाला.

हेही वाचाः Bull Run: निर्देशांकांची विक्रमी वाटचाल सुरूच, निफ्टीनं प्रथमच गाठला २० हजारांचा टप्पा

निफ्टीने २० हजार अंकांचा टप्पा ओलांडला

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टीने २० हजार अंकांचा टप्पा ओलांडला. ट्रेडिंग सत्रादरम्यान निफ्टीने २०,००८.१५ अंकांचा उच्चांक गाठला. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर आज निफ्टी १९,८९० अंकांवर उघडला आणि बाजार बंद झाल्यानंतर तो १७६.४० अंकांच्या वाढीसह १९,९९६.३५ अंकांवर बंद झाला. सप्टेंबर महिन्यात निफ्टी ३.८५ टक्क्यांनी वाढला आहे. या काळात निफ्टीने ७४२.५५ अंकांची वाढ नोंदवली आहे. निफ्टीची ही पातळी शेवटची २० जुलै रोजी दिसली होती. त्यावेळी निफ्टीने १९,९९१.८५ अंकांसह उच्चांक गाठला होता.

हेही वाचाः विश्लेषण : जी २० मध्ये सहमती झालेलं ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स काय? पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूकदारांना फायदा झाला

सप्टेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून भरपूर कमाई केली आहे. आजच बोलायचे झाले तर ३.३१ लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांच्या खिशात आले. बीएसईच्या आकडेवारीनुसार, बीएसईचे बाजारमूल्य शुक्रवारी ३,२०,९४,२०२.१२ कोटी रुपये होते, जे आज ३,२४,२५,३२५.७४ कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ बाजार मूल्यात ३,३१,१२३.६२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे जर आपणाला संपूर्ण सप्टेंबरबद्दल बोलायचे झाल्यास ३१ ऑगस्ट रोजी बीएसईचा बाजार मूल्य ३,०९,५९,१३८.७० कोटी रुपये होता. ज्यामध्ये तेव्हापासून १४,६६,१८७.०४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.