सुश्रुत रवीश

नितीशास्त्राच्या अभ्यासामध्ये कायमच पुढील तीन सिद्धांतांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

(१) उपयुक्ततावादी मांडणी

(जेरेमी बेंथम, जे.एस. मिल)

(२) कर्तव्यवादी विचारसरणी

(इमॅन्युएल कान्ट, रॉल्सची न्यायाची मांडणी)

(३) सद्गुणांवर आधारित विचारसरणी

(प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल)

आज आपण तिसऱ्या आणि शेवटच्या विचारणीची ओळख करून घेणार आहोत.

सद्गुणांवर आधारित नैतिक विचारसरणी

नैतिक तत्त्वज्ञानाच्या अगदी सुरुवातीच्या जडणघडणीपासून या मांडणीकडे पाहूयात.

सॉक्रेटीसचा शिष्य असलेल्या प्लेटोने त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीत व येणाऱ्या काळात अथेन्स व सर्व जगाला चकीत करून सोडले. याचबरोबर अ‍ॅरिस्टॉटल सारखा तत्त्ववेत्ता बनवण्याचे कामही त्याने केले. अतिशय मोठय़ा प्रमाणात साहित्य निर्मिती व विचारनिर्मिती करणाऱ्या प्लेटोचे सर्वात महत्त्वाचे सैद्धांतिक काम The Republica यामधून केले गेले आहे. The Republica मधील एकंदरीत विवेचनात नितीनियमांविषयी (Ethics)  खालील दोन प्रमुख मुद्दे स्पष्ट केले आहेत.

(१) नितीनियम सापेक्ष नसतात.

(२) नितीनियम न्यायाची संकल्पना स्पष्ट करतात व न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेतील टप्पे समजावून घेण्यासाठी नितीनियमांच्या चौकटीचा उपयोग होतो. प्लेटोने नैतिक निर्णयक्षमतेचा गाभा मनुष्याच्या ठायी असलेले मूलभूत सद्गुण आहेत, अशी मांडणी केली. माणसाला पूर्णत्व प्रदान करणाऱ्या पुढील गुणांना प्लेटोने मूलभूत सद्गुण (Cardinal Virtues) म्हटले —

(१) धैर्य (Fortilude),

(२) संयम (Temperance),

(३) शहाणपण (Wisdom), आणि

(४) न्याय (Justice)

प्लेटोच्या मते या चार एकमेकांपासून सुटय़ा गोष्टी नव्हेत. एकाच संघटीत व्यक्तिमत्त्वाचे ते विविध पैलू आहेत. त्यातील अधोरेखित करायची बाब म्हणजे, न्याय हा गुण इतर गुणांचे एकमेकांवर अतिक्रमण होऊ देत नाही. वरीलपैकी पहिल्या तीन गुण वैशिष्टय़ांचा उत्तम विकास झाल्यास त्यांची परिणती चौथ्यात म्हणजे न्यायात होते.

प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल यानेदेखील नितीनियमविषयक सद्गुणांवर आधारित सवयी रूजविण्यावर व जोपासण्यावर भर दिला. त्यांच्यामते, प्रत्येक गोष्टीची ओढ तिच्या स्वाभाविक स्थितीकडे म्हणजेच ‘स्व’त्वाकडे असते. मग असा प्रश्न पडतो की, माणसाचे स्वत्व कशात आहे, माणसाचा खरा ‘स्व’भाव कोणता? अ‍ॅरिस्टॉटलच्या मते, विवेक (Reason) हेच माणसाचे स्वत्व आहे. माणसाची ओढ विवेकाकडे असली पाहिजे. अ‍ॅरिस्टॉटलच्या मांडणीतील पुढचा महत्त्वाचा विचार म्हणजे, प्रत्येक वस्तूस काही कार्य (Function) असते. ते कार्य व्यवस्थित करणे हेच तिचे कल्याण अथवा चांगलेपण होय. उदा. चप्पलचे कार्य पायाचे संरक्षण करणे आहे असे मानले, तर ‘चांगली’ चप्पल तिच असू शकेल जी हे कार्य व्यवस्थितपणे पार पाडते. याच धर्तीवर, मनुष्य या दृष्टीने माणसाचे कार्य काय, याचे अ‍ॅरिस्टॉटलच्या मते ‘विवेकाने वागणे’ असे उत्तर आहे. विवेकपूर्ण असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वत्व आहे. मात्र विवेकी असण्यामध्ये साधारणत: जी भावनाशून्यता गृहीत धरली जाते, ती अ‍ॅरिस्टॉटलला अपेक्षित नाही. किंबहुना, भावना न नाकारता माणसाच्या अनेक उर्मी, प्रवृत्ती, वासना, आणि आकांक्षा असतात. त्यांच्यातील संघर्ष टाळून संवाद निर्माण करणे हे विवेकाचे काम होय. विवेकयुक्त जीवन म्हणजे एकसंध व्यक्तीमत्त्व (integrated personality) असा अर्थ अ‍ॅरिस्टॉटलच्या मनात आहे. माणसाने स्वत:च्या स्वत्वाप्रमाणे म्हणजे विवेकाला अनुसरून वागणे याचा अर्थ सद्गुणी जीवन जगणे हा होय.

एकदा कार्य म्हणजेचो Function ठरल्यानंतर Proper function म्हणजे काय हे ही ठरवावे लागेल अशी मांडणी त्याने केली. मनुष्याच्या बाबतीत सुवर्णमध्य— Golden mean साधत विवेकाचा वापर करणे हे अ‍ॅरिस्टॉटलच्या मते Proper Function आहे.

सद्गुण ही नेमकी वा ठरावीक गोष्ट नसून ती परिस्थितीनुरूप बदलत असते हा या मांडणीचा गाभा आहे. सद्गुणाची कमतरता (Deficit Vice) किंवा अतिरेक (Excess Vice) यातून कोणत्यातरी प्रकारचा दुर्गुण जन्म घेत असतो, अशीही मांडणी आहे, आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने हा सुवर्णमध्य गाठत निर्णय घेण्याचे कौशल्य अंगी बाणवले पाहिजे. अशी व्यक्ती योग्य प्रसंगी आवश्यक योग्य तितकेच बोलू शकते, ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये सहजता आणू शकते, अवघड किंवा दु:खद बातमी संवेदनशीलतेने सांगू शकते, उद्धटपणा न दाखवता आत्मविश्वासाने सामोरी जाऊ शकते, उधळपट्टी टाळून दिलदारपणा दाखवू शकते. या आणि अशा अनेक प्रसंगांमध्ये ‘योग्य’, ‘नैतिक’ वागणारी व्यक्ती ‘सुवर्णमध्य’ साधू शकणारी असते. असा या मांडणीचा दावा आहे. एकंदरीतच अ‍ॅरिस्टॉटलच्या virtue ethics चा भर व्यक्तीच्या गुणवैशिष्टय़ांवर आहे आणि या मांडणीत कोणत्याही प्रकारचे ठरावीक साचेबद्ध नियम नाहीत.

अशाप्रकारचे वर्तन करणे सोपे नाही. यासाठी समाजामध्ये नैतिक आदर्शाची (moral exemplars) ची गरज असते. सुरूवातीच्या टप्प्यात या आदर्श व्यक्तीमत्त्वांकडे पाहून आणि केवळ त्यांची नक्कल करून योग्य मार्गाने जाता येते. योग्य किंवा नैतिक वागण्याच्या सवयीने देखील व्यक्ती अधिक अधिक नैतिक बनत जाते, असा या मांडणीचा विश्वास आहे.

‘You are what you do repeatedly’ हे अ‍ॅरिस्टॉटलचे प्रसिद्ध वाक्य हीच मांडणी सांगणारे आहे. अशाप्रकारे सुवर्णमध्य शोधण्यासाठी जगत असताना स्वत:चे आणखी चांगले रूप मिळवण्याच्या मूलभूत इच्छेला चालना मिळते. यातून व्यक्ती आणि समाज (Eudaimonia) गाठू शकणारे म्हणजेच मानवी भरभराटीचे, परिपूर्णतेचे आयुष्य जगू शकतो.

इ.स.पूर्व ३७० च्या सुमारास मांडलेल्या या विचारांमध्ये प्रचंड सामथ्र्य आहे. आपण या आधी पाहिलेल्या नैतिक विचारांचे मूळ निर्णयातून मिळणाऱ्या सुखात किंवा उपयुक्तततेत, कर्तव्याच्या जाणिवेत, न्यायपूर्ण भूमिकेत दडलेले होते. मात्र प्लेटो—अ‍ॅरिस्टॉटलचा नैतिक विचार व्यक्तितील स्वाभाविकत: नैतिक असणाऱ्या गुणांवर भर देतो. केवळ परिणामांचा, सुखाचा, कर्तव्याचा विचार करून व्यक्तिच्या नैतिक धारणांचा विचार पूर्ण होत नाही, हे विसाव्या शतकात पुन्हा नव्याने मान्य झाले आहे व नैतिक निर्णयांमध्ये कळीची ठरणारी व्यक्तिची भूमिका पुन्हा एकदा अभ्यासली जात आहे. कान्टबरोबरच मार्टिन ुम, नित्शे या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सद्गुणांवर आधारित नैतिक विचारसरणीला बळ दिले आहे.

या टप्प्यावर आपण सर्व प्रमुख नैतिक विचारसरणींची ओळख करून घेतली आहे. नैतिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासाच्या आणि जडणघडणीच्या विविध टप्प्यांचा मागोवा घेणे, आणि यूपीपएससीच्या सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरच्या दृष्टीने या विचारांची प्रस्तुतता स्पष्ट करणे हा या लेखांमागील प्रमुख हेतू आहे. याचसाठी पुढील लेखात आपण या विचारसरणीचे परिक्षेच्या दृष्टीने महत्त्व पाहणार आहोत. आतापर्यंत यूपीएससीने घेतलेल्या तीन पेपरच्या विश्लेषणातून या नैतिक विचारसरणींचे महत्त्व आपण पुढील लेखात पाहणार आहोत.