भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर केंद्र सरकारला सैनिक कल्याणाचे योग्य नियोजनाची गरज भासू लागली होती. त्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळीच्या तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठन केले होते. या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांसाठी निधी संकलनाची योजना कार्यान्वित केली गेली. या संकल्पनेला ‘ध्वजदिन’ असे संबोधण्यात येऊ लागले. या मागे एकच उद्दात विचार डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता, की देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी व कल्याणासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान हे महत्त्वाचे आहे. ही संकल्पना सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक होती. स्वातंत्र्यानंतरही देश नैसर्गिक आपत्तीबरोबरच दहशतवादासारख्या घटनांना सामोरा जात आहे. यावेळी देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैन्य या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जात आहे. त्यांच्या या कामगिरीला प्रत्येक भारतीयाच्या योगदानासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आजही या संकल्पनेला चालना दिली जात आहे. मूळ ध्वजदिन निधीची उभारणी संरक्षण मंत्रालयाच्या समितीद्वारे १९४९ मध्ये केली गेली. त्यानंतर १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सैनिक कल्याणसंबंधी सर्व निधी सशस्त्र दल ध्वजदिन फंडामार्फेत एकत्रित केला गेला. हा निधी शासन खालील गोष्टींसाठी खर्च करते. कल्याणकारी निधीच्या एकूण ४४ प्रकारच्या योजनांसाठी आर्थिक मदत. विशेष निधीतून सैनिकी मलां/ मुलींची वसतिगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. सैनिकांच्या कल्याणासाठी खालील प्रकारे निधी संकलित करता येतो. रोख रक्कम भरून. चेकद्वारे निधी देता येऊ शकतो. पेटीएम किंवा अॅपच्या साहाय्याने मदत देता येऊ शकते. सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे थेट चेक व रोख रक्कम भरता येऊ शकते. संपर्कासाठी पत्ता- सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य ‘रायगड’ दुसरा मजला, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे-४११००१. दूरध्वनी- ०२२-६६२६२६०५, ई मेल- resettel.dsw@mahasainik.com संकेतस्थळ - www.mahasainik.com