नित्यनूतनशील ऊर्जा कार्यक्रम –
महाराष्ट्रातील आदिवासी भागात आदिवासी जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या आदिवासी उपयोजनेंतर्गत अपारंपरिक ऊर्जाविषयक योजना राबविल्या जातात. त्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी महाऊर्जा निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यातील आदिवासी जिल्ह्य़ात उपलब्ध निधीनुसार विविध ऊर्जाविषयक योजना राबविल्या जातात.
ग्रामीण विद्युतीकरण योजना –
केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्युतीकरण न झालेल्या सर्व अतिदुर्गम गावे, वाडय़ा, वस्त्यांमध्ये विद्युतीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. पैकी तीनशेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांचे/वाडय़ांचे/पाडय़ांचे विद्युतीकरण करणे हेही योजना राबविण्याचे उद्दिष्ट आहे.
आश्रमशाळांमध्ये सौर संकरित संयंत्र –
राज्यातील आदिवासी व दुर्गम क्षेत्रात शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहे आहेत. आदिवासी व दुर्गम भागात भारनियमनाच्या परिस्थितीमुळे विद्यर्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होता. त्यावर एक उपाय म्हणून ज्या ठिकाणी शक्य आहे. तेथील आश्रमशाळेत पवन सौर संकरित संयत्राद्वारे वीजनिर्मिती करून विजेची गरज काही प्रमाणात भागविण्यासाठी सदर योजना राबविण्यात येते.
ग्रामपंचायतीसाठी ऊर्जा, कार्यक्षम पथदिवे योजना –
गावातील पथदिव्यांसाठी बहुतांश साध्या बल्बचा वापर करण्यात येतो. त्यासाठी १०० वॅटचे बल्ब बसविले जातात. साध्या बल्बची ऊर्जा कार्यक्षमता अत्यंत कमी असल्यामुळे विजेचा अपव्यय होत असतो. तसेच त्यांचे आयुष्यमानही कमी असल्याने वारंवार दिवे बदलावे लागतात. म्हणून ऊर्जा कार्यक्षम पथदिवे ही योजना घेण्यात आली असून त्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात उर्जा वापर व खर्चामध्येही बचत होते.