Success Story: देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षं झाली तरीही आजही अनेक घरांमधील महिला असुरक्षित आहेत. लग्नानंतर सासरकडच्यांकडून विविध कारणांमुळे महिलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो. अनेक महिला हे सर्व आयुष्यभर सहन करतात; तर काही जणी हिंसाचाराला कंटाळून आपलं आयुष्य संपवतात. पण, अशादेखील अनेक महिला समाजात आहेत की, ज्या अशा सर्व गोष्टींकडे पाठ करून योग्य तो निर्णय घेण्याचे धाडस दाखवतात. आज आम्ही अशाच एका महिलेचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत.

मध्य प्रदेशातील मंडई गावातील आदिवासी कुटुंबातील सविता यांना आयुष्यात अनेकदा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. शाळेत मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना दहावी पूर्ण करण्यास मदत मिळाली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गावातील दहावीपर्यंतचे शिक्षण घेणारी पहिली मुलगी ठरण्याचा मान मिळाला. त्यानंतर त्यांना सात किमी अंतरावरील असलेल्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला. शाळेचीफी भरण्यासाठी त्यांच्या आईने अर्धवेळ काम करण्यास सुरुवात केली.

१६ व्या वर्षी मनाविरुद्ध लग्न

विज्ञानाची आवड असणाऱ्या सविता यांना डॉक्टर व्हायचे होते. शाळा संपण्याच्या काळात वयाच्या १६ व्या वर्षी एका श्रीमंत कुटुंबातून त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला. त्यामुळे सविताच्या पालकांनी त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना जबरदस्तीने लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात आले. लग्नानंतर त्यांना पतीसह सासरच्या मंडळीकडून घरगुती हिंसाचार सहन करावा लागला. अनेकदा त्यांचा नवरा त्यांना मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकीही द्यायचा. सविता यांना दोन मुलं झाल्यानंतरही हा हिंसाचार सुरूच होता.

मुलांना घेऊन सोडले घर

घरगुती हिंसाचारामुळे जीवाला वैतागल्याने सविता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला; परंतु नंतर त्यांनी मुलांच्या विचारानं हिंमत एकवटली आणि फक्त २,७०० रुपये घेऊन दोन्ही मुलांसह घर सोडलं. घर सोडल्यानंतर मुलांच्या खर्चासाठी त्यांनी ब्युटी सलून उघडलं आणि मुलांनाही शिकवायला सुरुवात केली. त्या काळात त्यांचे आई-वडील आणि भावंडांनीही त्यांना साथ दिली. त्याशिवाय त्यांनी भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासनात बीए करण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्याच प्रयत्नात यश

त्यानंतर त्यांनी राज्य नागरी सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सविता यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांना मुख्य नगरपालिका अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना अनेक बढत्या मिळाल्या.