शुभा प्रभू साटम

अत्यंत जोखमीचं काम असणाऱ्या, जबाबदारीच्या आणि तरीही कर्तव्यपूर्तीचा सुखद अनुभव देणाऱ्या अग्निशमन दलातही स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे. अलीकडेच १००च्या वर स्त्रियांची अग्निशामक कर्मचारी म्हणून झालेली भरती, हे त्याचंच द्योतक.

डिसेंबर महिन्यात मुंबईत सुरू झालेलं अग्निसत्र जानेवारीतही सुरूच होतं. गेल्या महिन्यात, डिसेंबरमध्ये सहा ठिकाणी आग लागली आणि त्यात २० जणांचा मृत्यू झाला, तर गेल्या सहा वर्षांत मुंबईतील २९ हजार ठिकाणी आग लागण्याच्या आणि त्यात अनेक स्थानिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अर्थात त्यात अडकलेल्या अनेकांची सुखरूप सुटकाही करण्यात आली. यात महत्त्वाचा सहभाग ठरला तो मुंबईच्या अग्निशमन दलाचा.

अत्यंत धोकादायक, जबाबदारीच्या आणि तरीही कर्तव्यपूर्तीचा सुखद अनुभव देणाऱ्या या पुरुषी क्षेत्रात स्त्रियांचाही सहभाग वाढतो आहे, ही महत्त्वाची गोष्ट. मुंबई अग्निशमन दलात अलीकडेच १००च्या वर स्त्रियांची अग्निशामक कर्मचारी म्हणून झालेली भरती, हे त्याचंच एक द्योतक.

याआधी २०१२ मध्येही अशी भरती झाली होती, पण इतक्या मोठय़ा संख्येने स्त्रियांना अग्निशमन दलात रुजू करून घेण्याचा हा पहिला प्रसंग; त्यातही आणखी एक बाजू म्हणजे या सर्व तरुण स्त्री कर्मचारी बहुतेक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून आलेल्या आहेत. स्त्रिया ट्रेन चालवतात, लष्करात आहेत, कमांडो असतात, पोलीस, वैमानिक, अंतरिक्षयात्री अगदी सगळीकडे त्या आहेत. पण अत्यंत धोकादायक अशा जिवावरच्या जोखमीचे काम सांभाळणाऱ्या आणि पुरुष कर्मचाऱ्यांचं वर्चस्व असणाऱ्या या मुंबई अग्निशमन दलाने ही भरती करून बाईच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास सिद्ध केलाय हे नक्की!

यातली ग्रामीण भागामधील मुलींची भरती म्हणजे नव्या विचारांचा स्वीकार खेडय़ात अधिक झालाय याचे गमक म्हणता येईल. मुख्य म्हणजे या तरुणींना त्यांच्या घरातून भक्कम पाठिंबा मिळालाय. या मुलींपैकी काही विवाहित आहेत. काही आई आहेत, पण ती गोष्ट त्यांच्या या निर्णयाच्या आड आलेली नाही. पालघर जिह्य़ामधील तेजस्वी गायकवाड ही तरुणी. पूर्ण विचारांती अग्निशमन दलात आलेली आहे. तिची सहकारी रसिका आव्हाड वय २३ वर्षे फक्त. नाशिक येथून आलीय. दोघींनीही त्यांना त्यांच्या कुटुंबाचा असणाऱ्या भक्कम पाठिंब्याचा आवर्जून उल्लेख केला.

पोलीस वा इतर दलातील कामेही धोकादायक असतातच, वादच नाही, पण अग्निशमन दलाचे काम आपण थोडे अधिकच धोकादायक म्हणू शकतो. कारण प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचेपर्यंत नक्की काय परिस्थिती आहे? किती जण अडकलेत? आगीचे स्वरूप? रसायनांच्या, वायूच्या स्फोटाची शक्यता या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे घटनास्थळावरच मिळतात. त्याआधी फक्त अचूक अंदाज करून त्यानुसार योजना आखणी करावी लागते. तरीही एकदा का लोकांच्या सुटकेसाठी आगीच्या ठिकाणी घुसले की पुढे काय होईल? अंगावर काय कोसळेल? अन् कितपत याची बिलकूल शाश्वती नसते, शिवाय त्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप काढायचे असते.

स्त्रियांची जी उपजत संवदेनशीलता असते ती या वेळी खूप कामी येते, असे मत वडाळा अग्निशमन दल प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी अधिकारी विष्णू सांगळे यांनी व्यक्त केले. भरतीच्या वेळी, अगदी सुरुवातीला ते थोडेसे सांशक होते. पण प्रशिक्षणाच्या खडतर प्रक्रियेला सुरुवात झाली आणि भरती झालेल्या सर्वजणी त्या कसोटीला पूर्ण उतरल्या. सांगळे म्हणाले की, ‘‘एकदा का गणवेश अंगावर चढला की ती व्यक्ती फक्त अग्निशमन दल कर्मचारी होते. त्यात बाईपुरुष असा भेद उरतच नाही. हे टीमवर्क आहे. आणि या सर्व मुली त्यात तरबेज झाल्या आहेत. सुरुवातीला भीती वाटणे नैसर्गिक होते. पण त्यानंतर त्यांचे पुरुष सहकारी जी जी कामे करतात ती ती सर्व कामे या मुली पार पाडू लागल्या आहेत, तितक्याच क्षमतेने!

या नव्या भरती झालेल्या मुलींना काम आवडतेय. आपण कोणाचा तरी जीव वाचवलाय ही भावना त्यांना सुखावून जाते. आपल्याला आगीच्या लोळामधून वाचवणारी एक स्त्री आहे हे लोकांना जेव्हा कळले तेव्हा त्यांच्या नजरेमधील आदर, कृतज्ञता हुरूप आणणारी असते, असं मत या दलातील अनेकींनी व्यक्त केले. या तरुणी मुंबईच्या वेगवेगळ्या अग्निशमन दलांमध्ये रुजू झालेल्या आहेत. सोबतचे पुरुष सहकर्मचारी कसे वागतात या प्रश्नावर सर्वाचे उत्तर होते की, अत्यंत समजूतदारपणे. नव्या मुलींना सांभाळून घेणे, अनुभव सांगणे, पूर्वसूचना देणे हे सर्व त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांकडून होते. मासिक पाळी असताना त्रास होत असल्यास समजून घेतले जाते, म्हणजे कामाच्या ठिकाणी जे निकोप वातावरण हवे ते नक्कीच आहे.

त्याचा अर्थ सर्व १०० टक्के आलबेल आहे का? तर नाही, कारण उडदामाजी काळेगोरे असतातच. काही ठिकाणी काही मुलींना त्रास सहन करावा लागतो. कामाच्या ठिकाणी कपडे बदलण्याची जागा पुरेशी नसते, तर कधी शौचालय स्वतंत्र नसते. क्वचित काही चूक झाली म्हणा किंवा कौटुंबिक अडचण आली तर शेरेबाजी होते, टोमणे मिळतात. पण हे प्रकार तसे कमी आहेत.

इथे सांगण्याचे दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा सुरुवातीला व्यक्त होतो की ग्रामीण भागामधील मुलींमध्ये येणारे आत्मभान आणि त्यांच्या निर्णयाला स्वीकारून पाठिंबा देण्याची कुटुंबाची भूमिका. जेथे कौर्मायचाचणी आजही करायला लावली जाते, तेथे हा बदल नक्कीच आशा जागवणारा आहे. गावखेडय़ामधील मुलगी ठरवून जेव्हा हे क्षेत्र निवडते, स्वीकारते तेव्हा जाणवते तिची प्रगल्भता आणि पर्यायाने येणारे कौटुंबिक सामंजस्य. या सर्व मुलींमधील काही जणी विवाहित आहेत आणि त्यांच्या सासरच्या मंडळींचा, नवऱ्याचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे. एकीला तर लहान मूल आहे, तिला कामाच्या शिफ्ट्स असतात. कागदोपत्री डय़ुटीचे ठरावीक तास असले तरी अनेकदा उशीर होतो, डबल डय़ुटी करावी लागते. अशा प्रसंगी घरी आपले मूल सुरक्षित आहे याची शाश्वती तिला असते.

अग्निशमन दलासारख्या पुरुषी वर्चस्वाच्या कार्यक्षेत्रात या मुली प्रवेश करतात आणि कसोटीवर उतरतात. बाई म्हणून नैसर्गिक शरीराचा फरक वगळल्यास अन्य कर्मचारी आणि आम्ही तितकेच कार्यक्षम आहोत हे सिद्ध करतात. जीव धोक्यात घालून अनेकांचे आयुष्य वाचवतात. अग्निप्रलयात निडर होऊन घुसतात. कामाच्या ठिकाणची बाई आणि पुरुष यामधली ही पुसत जाणारी असमानतेची रेघ बदलत्या काळाचंच लक्षण आहे.

shubhaprabhusatam@gmail.com