आजच्या त्रिकोणी वा चौकोनी कुटुंबातला आईचा एक कोन निखळला, तर ती जागा भरून काढणं कठीण असलं तरी अशक्य नसतं. अनेक बाबांनी आव्हानांना सामोरं जात, अनेक तडजोडी करत, नव्या गोष्टी शिकत, स्वत:ला विसरत, मुलांच्या भावविश्वात जागा निर्माण केली आहे. अशाच या काही एकल बाबांची ही कहाणी…

अनंत काळापासून मुलं वाढवण्याचं गौरवस्थान मातेला मिळत आलेलं आहे, पण हळूहळू आपला समाज या चौकटीतून बाहेर पडू लागला. आजकालचे वडील हे बदलत्या काळासोबत स्वत:ला जुळवून घेणारे जास्त दिसतात. कर्ते पुरुष म्हणून नोकरी-व्यवसाय करत तटस्थपणे घर चालवणारे, एवढ्यापुरतं आता त्यांचं बापपण मर्यादित राहिलेलं नाही. ते आपल्या मुलांच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रियपणे, त्यांच्या भावविश्वाशी समरसून सहभागी होत असतात. आणि जेव्हा हे बाबा एकल पालक असतात तेव्हा?

विशेषत: जेव्हा घटस्फोटानंतर मुलांचा ताबा वडिलांकडे जातो, तेव्हा अनेकांना वाटतं की, हे बाबा एकल पालक म्हणून कदाचित मागे पडतील. पण वास्तवात, आज अनेक बाबा असे आहेत जे मुलांना त्यांच्या आईच्या मायेची उणीव जाणवू न देता योग्य संस्कार देतात, भावनिक आधार देतात, त्यांच्या आयुष्याचा आधार बनतात. बदलत्या समाजरचनेमध्ये आता विवाह-भेद झाल्यानंतर मुलांचे पालकत्व वडिलांकडे येण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर स्त्रीला स्वत:च्या आयुष्याची घडी नव्याने बसवताना राहण्यासाठी व्यवस्था करणं, नोकरी नसल्यास उत्पन्नाचं साधन शोधणं, आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांची डोळसपणे पारख करणं, इत्यादी अनेक आघाड्यांवर त्या ‘घटस्फोटित’ स्त्रीला सामना करावा लागतो. अशा वेळी आपल्याबरोबर आपल्या मुलांचीही ससेहोलपट होऊ नये म्हणून मुलांवर आंधळं प्रेम न दाखवता मुलांच्या भावविश्वाचा विचार करून त्यांच्या सर्व आर्थिक व सामाजिक गरजा पूर्ण व्हाव्यात याचा आणि काही वेळा स्वत:च्या करिअरचा प्राधान्याने विचार करणाऱ्या स्त्रिया घटस्फोटानंतर मुलांचं पालकत्व पतीकडे सोपवताना दिसून येत आहेत.

‘फादर्स डे’च्या निमित्ताने अशाच काही एकल पालक असलेल्या बाबांशी बोलणं झालं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे होते. संजय कुलकर्णी आर्किटेक्ट आहेत. म्हणाले, ‘‘घटस्फोट झाला त्या वेळी मुलं माझ्याकडेच होती. मुलगी ७ वर्षांची आणि मुलगा १३ वर्षांचा होता. मुलांना न्यायालयात एकदाही न नेता परस्पर संमतीने आम्ही घटस्फोट घेतला. माझ्या घरी माझे आई-वडील होते, परंतु ते वयस्कर असल्याने मुलांची जबाबदारी खऱ्या अर्थाने माझ्यावरच होती. मानसिक दडपण आलेलं होतं, पण मुलांसाठी कुठंही कमी पडायचं नाही असं ठरवलं. त्यासाठी माझ्या करिअरमध्ये अनेक तडजोडी कराव्या लागल्या. अनेक दिव्यातून जावं लागलं. माझ्या पालकत्वाचा अक्षरश: कस लागला. अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. तरीही एक जाणवत राहायचं, आपण मुलांची कितीही काळजी घेतली तरी मुलांच्या मनात अनेक वादळं चालू असतात.

मुलं बोलली नाहीत तरी त्यांच्या वर्तनातून अनेक गोष्टी समजतात. इतर मुलांचे आईबाबा एकत्र असतात, आपल्याकडे तसं नाही म्हणजे आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, या विचारांचा पुढे जाऊन मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून मी वेळीच पावलं उचलली आणि कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशकांच्या मदतीने माझ्यासारख्या एकल पालकत्व निभावणाऱ्या अनेकांना- त्यात पुरुषही होते आणि स्त्रियाही, एकत्र करून एक सपोर्ट ग्रुप तयार केला. त्यामुळे आम्ही सगळे जण महिन्यातून एकदा तरी मुलांसह भेटायचो,फिरायला जायचो, वेगवेगळ्या विषयांवर, अडीअडचणींवर चर्चा करायचो, मार्ग सुचवायचो. त्यामुळे अनेक कुटुंबं आपल्यासारखी आहेत हे मुलांनाही समजलं. आणि एकट्याने मुलं वाढवताना येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरं जाणं शक्य झालं. माझा मुलगा आर्किटेक्ट झालाय आणि मुलगी डॉक्टर आहे, मी समाधानी आहे.’’

एकल पालकत्व स्वीकारून ते निभावणं वाटतं तेवढं सोपं नाही आणि पुरुषांना तर ही जबाबदारी पेलवणं हे एक प्रकारचं आव्हानच ठरतं. निखिल म्हणाले, ‘‘माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासूनच माझी तिच्यामध्ये खूप गुंतवणूक होती. ती लहान असताना तिला माझ्या दोन पायांवर घेऊन तेल लावून न्हाऊ-माखू घालण्याचा आनंदही मी घेतला होता. तिच्या जन्मापासूनच आमच्यात दृढ बंध निर्माण झाले होते. पण पुढे माझे आणि पत्नीचे वैचारिक मतभेद तीव्र झाले आणि जेव्हा एकमेकांबरोबर राहाणं अशक्य आहे हे लक्षात आलं तेव्हा आमचा घटस्फोट झाला. मुलगी माझ्याकडेच राहिली. माझे आई-वडील हयात नव्हते, त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावरच होती. मुलीच्या वेण्या कशा घालायच्या इथपासून सर्व शिकलो.

स्वयंपाक शिकण्यासाठी कुकिंग क्लास लावला होता. तिची शाळा- अभ्यास- विविध उपक्रम हे तर नियमित होतंच; परंतु तिच्याबरोबर खेळताना तिच्या छोट्या विश्वातील गमतीजमती वाटून घेण्यात मी रमू लागलो. माझ्या मुलीला सर्व सुखं मिळावीत यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत होतो, पण एक दिवस मला प्रचंड दडपण आलं. एक दिवस ती शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या गणवेशावर रक्ताचा डाग पडला होता. ती माझ्या जवळ आली. माझ्याभोवती घुटमळत राहिली. तिच्या चेहऱ्यावर मला प्रचंड गोंधळ दिसत होता. तिला काही तरी बोलायचं आहे हे मला कळत होतं, पण ती बोलत नव्हती. खरं तर तिच्या अगदी लहानपणापासून प्रेम आणि शिस्तीचा एक छान तोल आमच्यामध्ये होता. ती सर्व गोष्टी माझ्याशी बोलायची, पण तरीही त्या दिवशी ती मूक होती. शेवटी मीच, ‘‘तू माझ्याशी बोलत का नाहीस, काय झालंय?’’ असं म्हणत जवळ घेतलं तेव्हा तिचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. मी अस्वस्थ. अखेर तिचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, ‘‘बाबा, आज टीचरनं सांगितलं की, तुझ्या युनिफॉर्मवर रक्ताचा डाग पडला आहे, हे घरी जाऊन फक्त आईला सांग. इतर कुणालाही सांगायचं नाही. बाबा, माझी आईसुद्धा तूच आणि बाबासुद्धा तूच आहेस, तरीही मी तुला काही सांगायचं नाही का?’’ तिच्या या प्रश्नाला काय उत्तर द्यावं, हेच मला कळत नव्हतं. तो दिवस माझ्यासाठी खूप अवघड होता. दुकानात जाऊन सॅनिटरी नॅपकिन आणायलाही मला संकोच वाटत होता. हे निसर्गचक्र तिला कसं समजून सांगायचं याचं दडपण आल्यावर मी समुपदेशकांची मदत घेतली. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझी मुलगी आता मोठी झाली हे पचवणं मला खूप अवघड गेलं होतं.’’

संतोष सांगतात, ‘कावेरी फारच लहान होती. नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं असेल. न्यायालयातील अनेक प्रक्रियांनंतर मुलीचा ताबा माझ्याकडे आला. ती माझ्याकडे यायलाच तयार नव्हती. रडून गोंधळ घालायची नुसती. ‘तिची जबाबदारी मी पेलवू शकेन का?’ अशी भीती माझ्याही मनात होती. इतक्या लहान मुलीला माझ्याकडे सोपवताना स्त्री न्यायाधीशांच्या डोळ्यांतही अश्रू आले होते. माझी आई घरात असली तरीही ती व्यवसाय करणारी असल्याने मुलीची संपूर्ण जबाबदारी मीच घेतली होती. सुरुवातीच्या काळात खरंच खूप त्रास झाला. रात्र रात्र जागून काढाव्या लागल्या. हळूहळू तिला माझी सवय झाली. मला बिलगून माझा हात घट्ट पकडून झोपू लागली, तेव्हा मला माझ्या जबाबदारीची खरी जाणीव झाली. घरातील प्रत्येक गोष्ट मी तिच्यासाठी शिकलो, तिचे कुरळे केस विंचरणं मला जमायचं नाही, तिच्या बोबड्या सुरात मला म्हणायची, ‘‘काय बाबा, एव्हल शुद्द्धा तुला येत नाही? जला हलू हलू केलश की तुला येईल, मी दुखलं तली ललनार नाही, तुला खलचं येईल.’’ ती छोटीशी ठामाकाकू तेव्हा माझीच आई व्हायची. मीही तिला काहीही कमी पडू दिलं नाही. त्या काळात व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष झालं, पण तिच्यासाठी वेळ काढत राहिलो. आता माझी कावेरी मोठी झाली आहे. आठवीत गेली आहे. आता प्रत्येक गोष्टीत तिला तिचा बाबा लागतो. हा प्रवास दमवणारा, पण समाधान देणारा आहे.’’

पत्नी नोकरीच्या निमित्तानं दीर्घकाळ परदेशात असताना वडील म्हणून जबाबदारी घेणारे महेश मुंडे म्हणाले, ‘‘पत्नीला ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जावं लागलं त्या वेळी मुलगा चार वर्षांचा होता. मला एकट्यालाच त्याला घेऊन राहावं लागलं. सकाळी घरचं सगळं आवरून, मुलाला डबा तयार करून देऊन ‘डे केअर सेंटर’मध्ये ठेवावं लागे. मुलाचं आजारपण, शाळेच्या ‘पेरेंटस् मीटिंग’, घरातील नित्य उपयोगी वस्तूंची खरेदी, स्वत:च्या नोकरीतील आव्हाने एकट्याने सांभाळताना जीव मेटाकुटीला यायचा. दोन्ही देशांच्या वेळेत फरक असल्यानं बऱ्याचदा पत्नीशी बोलणं व्हायचं नाही. जेव्हा मुलाला आई हवी असायची तेव्हा तिला फोन करता यायचा नाही, जेव्हा तिला त्याची आठवण यायची तेव्हा तो झोपलेला असायचा. त्यामुळे दोघांचं बोलणं व्हायचं नाही. अशा वेळी पत्नीही तिकडे अस्वस्थ असायची. तिची मन:स्थितीही मला सांभाळावी लागे. सुट्टीच्या दिवशी जेव्हा तो आईशी व्हिडीओ कॉलवर बोलायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातील चमक पाहण्यातच मला धन्यता वाटायची. औटघटकेचं ते एकल पालकत्व मला खूप काही शिकवून गेलं. तो पाच वर्षांचा काळ खूपच परीक्षा घेणारा होता, पण मुलाचं आणि माझं नातं भावनिकरीत्या दृढ झालं. त्याला मी एकट्याने सांभाळू शकलो आणि पत्नीला तिच्या करिअरमध्ये विशिष्ट उंची गाठता आली हे मला महत्त्वाचं वाटतं.’’

काही वेळेला पत्नीचं आजारपण किंवा अपघाती मृत्यू झाल्यास पित्याकडेच मुलांची जबाबदारी येते. संसार मध्यावर आला असताना पत्नी अचानक गेल्यावर मुलांचा आधार झालेले व्यास कुलकर्णी स्वत:चे अनुभव सांगत म्हणाले, ‘‘पत्नी कांता हिचं अचानक निधन झाल्यानंतर माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यात मुलांची जबाबदारी एकट्याने पेलवण्याचं आव्हान जास्त मोठं होतं. त्यामुळे दोन्ही मुलांकडे बघून पत्नीवियोगाचं दु:ख बाजूला सारलं. मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांची लग्नं लावून दिली. रितीभातीनुसार जावयाचे पाहुणचार केले. इतकंच नाही तर घरात नवीन आलेल्या सुनेला स्वयंपाक, पारंपरिक रीतीरिवाज, कुळधर्म, सण, उत्सावांतल्या परंपरा जे जे सासू शिकवते ते ते मी सुनेला शिकवलं.’’ हे सांगताना खूप मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचं समाधान त्यांच्या हुंदक्यांतून बाहेर पडलं.

आयुष्याच्या अर्ध्या वाटेत पत्नीची साथ सुटल्यानंतर मुलांना एकट्याने वाढवणारे शंकररावही आपले भावुक अनुभव सांगताना म्हणाले, ‘‘मुलीच्या लग्नात सगळे विधी मी एकट्यानेच केले. गौरीहार पुजून सासरी निघताना आईने मुलीची ओटी भरायची अशी प्रथा आहे. हे गुरुजींनी सांगितलं तेव्हा माझी लेक रडू लागली. ‘आई नसेल तर एका सवाष्णीने तिची ओटी भरावी,’ असं गुरुजी म्हणाले तेव्हा आश्वासक नजरेनं तिनं फक्त माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतील भाव मी ओळखले. हा मान तिला इतर कुणालाही द्यायचा नव्हता. तिची ओटी मी भरली तेव्हा माझ्या मिठीत येऊन ती मनसोक्त रडली. तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तिला तिचा बाबा सोबत हवा होता, एवढं मात्र मला यानिमित्तानं कळलं.

‘आई आहे ना घरी, सगळं पाहते ती. काळजी नको’ हे वाक्य आपण आत्तापर्यंत खूप ऐकलं आहे. पण जेव्हा आई नसते तेव्हा? आजचे वडील केवळ कमवणारे, कर्ते पुरुष राहिलेले नाहीत, तर घरातली माया, ऊब आणि अखंड सोबतही देणारे पालक बनले आहेत. खरं तर बापपण हे फक्त जन्म देऊन येत नाही, ते नातं आयुष्यभरासाठी निभवावं लागतं. थोडक्यात, बाबा असणं हे फक्त नातं नसतं, तो एक अखंड प्रवास आहे…

(लेखातील काही व्यक्तींची नावं बदललेली आहेत. लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.