जगताना गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न अनेकदा पडतो. नात्यानात्यांत देवाणघेवाण, तुझं-माझं होतंच आणि गरसमजांचा गुंता वाढतच जातो. वाढवला तर सुटायला अवघड जातो. एखादी निरगाठ बसते, पण प्रेमाच्या शब्दांनी सगळेच सुखावतात. खाडखाड आवाज करीत फेकलेले शब्द चिरा पाडतात मनावर, खोलवर. सबुरीने केलं की होतं सगळं ठाकठीक. धीराने घ्यावं लागतं सगळं प्रत्येक वेळी. गुंता अलगदपणे सोडवावा लागतो.’’
घर आवरता आवरता खूप लोकर सापडली सीमाला. व्वाव! याचं काहीतरी छान करणार असं ठरवतच होती, पण पाहते तर काय? फारच गुंतलेली होती लोकर. ‘सोडवीन नंतर’, असं म्हणत ठेवली बाजूला. आठ दिवस गेले. सीमाने मधूनमधून गुंता सोडवायचा प्रयत्न केला. विशेष काही घडलंच नाही.
रविवार उजाडला आणि सीमाची आई आणि आजी तिच्याकडे आल्या. कोपऱ्यात पसरलेल्या लोकरीकडे नजर जाताच आजीने ताबा घेतला तिचा. गुडघ्यात अडकवून, आतून घाल, वरून काढ, कधी या रंगाचा तर कधी दुसऱ्या रंगाचा हातात. करता करता दोन-तीन गुंडे तयारही झाले. सीमाने ते पाहिलं आणि चिकटली आजीला.
‘‘अगं सीमा, किती लोकर कापलीस गं भराभरा.’’
‘‘मग काय करू? सुटत नव्हता गुंता.’’
‘‘म्हणून काय झालं? कापल्यावर संपतं गं. जोडला धागा तरी गाठ राहतेच. वीणही सलग होत नाही अशा वेळी.’’
‘‘किती गुंता तिचा. मला नाही इतका वेळ. नाही सुटला. लावली कात्री. एकसारखे धागे बांधले परत. मी केलाय एक गुंडा,’’ असं म्हणून सीमाने आठवडाभरात सोडवलेला गुंडा दाखवला. आजीने हातात घेतला मात्र, स्वत:च्या हातातली लोकर ठेवली बाजूला.
‘‘सीमा, असं नसतं करायचं. किती घट्ट गुंडाळलीस लोकर. जरा मोकळीक हवी धाग्याधाग्यांमध्ये सलसर. हवा खेळली पाहिजे त्यातून. किती गाठी लागतात हाताला. संयम पाहिजे गुंता सोडवायला. मी केलेला बघ.’’
 ‘‘काय बघू आता?’’
 ‘‘अशी जवळ ये. काम ठेव बाजूला. अगं, गुंता, मग तो कुठलाही असो, सोडवायचा प्रयत्न करायचा. या लोकरीचा, घरातल्या पसाऱ्याचा, ऑफिसमधल्या कामाचा आणि आपल्या नात्यानात्यांचा. इतकंच कशाला, आपल्या भावनिक गुंतागुंतीचा. सोडवताना कुठे काही तुटणार नाही, धक्का लागणार नाही अशा प्रकारे हळुवार हाताने अलगदपणे सोडवला की तोडफोड होत नाही गं.’’
 ‘‘काय छान बोलतेस गं तू आजी.’’
 ‘‘सुविचार नुसते वाचायचे नसतात, अंगीकारायचे. नात्यानात्यांत देवाणघेवाण, तुझं-माझं होतंच आणि गरसमजांचा गुंता वाढतच जातो. वाढवला तर सुटायला अवघड जातो. एखादी निरगाठ बसते. ही बघ दोन लोकरींची कशी बसली. तरी अलगद सुईने मी काढते की नाही बघंच. जरा वेळ दे मला. माणूस प्रेमाच्या धाग्याने बांधलेला आहे, म्हणून गुंतत जातो सगळ्यांमध्ये. जिवापाड जपलं नातं म्हणजे आयुष्य कसं मऊशार, उबदार होतं. छान वाटतं. तसंच मनाचं. प्रेमाच्या शब्दांनी सगळेच सुखावतात. खाडखाड आवाज करीत फेकलेले शब्द चिरा पाडतात मनावर, खोलवर. सबुरीने केलं की होतं सगळं ठाकठीक. धीराने घ्यावं लागतं सगळं प्रत्येक वेळी.’’
ऐकता ऐकता एकीकडे आईने अलगद गुंता सोडवून एक रंग वेगळा केला.
‘‘बघं, माझ्या मुलीला जमलं. नातीला का नाही जमणार? शीक  पोरी. खूप अर्थ आहे त्यात. लोकर गुंडाळताना मनात विचार येतात घरादाराचे, तेथील गुंत्यांचे. सहज सुचत जातो काही तोडगा. कसं करावं, काय बोलावं, कोणाला सांगावं, समजवावं कसं. तेच तर करीत आले आयुष्यभर. हा गुंताच तुला सांगेल कसं वागायचं, बोलायचं, निस्तरायचं ते.
 ‘गीता’ आणि ‘गुंता’, आहे ना साधम्र्य. गीतेमध्ये ‘अर्जुना’च्या मनातला गुंता ‘भगवान श्रीकृष्णा’ने ‘गीता’ सांगून सोडवला. आजतागायत त्याच गीतेचे मार्गदर्शन घेतात सगळे. गुंता सोडवता आला नाही तर काय गत होते, वेगळं का सांगायला हवं? गत व्यवस्थित असताना उत्तम गती मिळते जीवनाला. गतिमान काळातील खाचखळग्यात तग धरून जगता आलं पाहिजे आपल्याला. दोनच अक्षरं ‘ग’ आणि ‘त’. समजली त्यांची ताकद.’’
‘आजी’ म्हणत सीमा आजीला बिलगली. तिला तिच्याच गतिमान जीवनातला गुंता आता टोचू लागला. त्यावर उपायही आजीच्याच बटव्यात आहे, हेही जाणवलं. एक पाऊलवाट दिसली दूपर्यंत गेलेली अंधूकशी. प्रत्येकाला कुठं तरी टोचणारी निरगाठ असतेच, लोकरीच्या निरगाठीपेक्षा कितीतरी भयंकर. सदोदित बोचणी सहन करणं एवढंच उरतं आपल्या हातात. कशी सोडवायची गुंतलेली गाठ? सीमाने आता गुंता सोडवायला घेतला, मनातला.. प्रश्न छळतात. जीव घाबरतो, सोडवायला गेलं आणि कात्री लागली तर सगळंच अवघड, त्यापेक्षा सहन करावं. असू देत अशीच आत ठुसठुसणारी गाठ. सोडवायचा प्रयत्न केला की गुंता सुटत जातो. शब्दांच्या मऊशार रेशीम लडीची ताकद अजमावायची असते, अशाच बिकट प्रसंगी. दीर्घ संवाद, तोही अधूनमधून साधला की सल होत सुटत जातो गुंता. खालून वर किंवा वरून बाहेर सोडवत जाताना जाणवतं, असं बोललं तर कदाचित नाही पटणार त्याला. वेगळ्या पद्धतीने बोलले तर? असंही करून बघू या का़? सीमाचे विचार सुरु झाले.
‘धीर धरावा लागतो,’ म्हणाली होती आजी. आजच्या ऐवजी उद्या बोललं तर ? आत्ता गडबडीत आहे रवी. निवांत क्षणी कसं जुळून येतात धागे. उगीच घाईघाईत, चुकीच्या वेळी काहीतरी बोललं जायचं मग, अर्धवटच राहणार सारं. सुई पण कामास येते गाठ सोडवायला. कदाचित मोठी सुई, नाहीतर दाभण लागेल मला हातात घ्यायला.. आपल्याच विचारावर हसायला येतं, तशी हळूच हसली सीमा.
आत्ता नकोच. सगळाच पचका होईल. दमादमाने घेतलं तर सुटेलही दोघांच्यातलं भांडण. लोकर ओढली तर तुटते नाही का? तशी लवकर नाही तुटत, चिवट असते नात्यांसारखी. पण पातळ होऊन विसविशीत होतो पीळ. एखादा धागा सटकतो. नात्यातले बंध अनेक भावनांशी लगडलेले असतात. एखादा धागा निसटतोय असं जाणवताच, खेचायचा पुऱ्या ताकदीनिशी आणि गुंफायचं एकत्र. वीण कशी एकसारखी यायला हवी ना. मस्त!
ऑफिसमध्ये असंच काहीतरी झालं. प्रकाशने प्रेझेन्टेशन दिलं आणि गहजबच झाला. बरंचसं चुकलेलं, घाईघाईत केलेलं, कुणालाच आवडलं नाही. सीमालाही खटकलं. त्याला थोडी मदत केली असती तर त्याच्यावर अशी वेळ नसती आली. दोनदा तसं प्रकाशने सीमाकडे बोलूनही दाखवलं होतं. आपलंच चुकलं, जाणवलं सीमाला. लोकरीच्या गुंत्यानेच सांगितलं. आपल्या धावपळीत दुसऱ्याला धक्का लागणार नाही, इजा होणार नाही हेही हवंच बघायला. ओढाओढी करून चालत नाही, दुर्लक्ष करून भागत नाही. माझी धावपळ कायमचीच. त्यातच बघायला हवंच होतं प्रकाशकडे. अशक्य नव्हतं, आपलं उगीचच बिझी असल्याचं भासवलं. आजी म्हणते तेच खरं.
मांडीवर डोकं ठेवलेल्या नातीला आजी गोंजारीत होती. थांबली थोडा वेळ. सीमाला आतल्या आत मोकळं झालेलं पाहून आजीने सुरुवात केली. ‘‘सीमा, तुम्हा मुलींचे केस कापलेले. त्यात गुंता तो काय गं! एक ब्रश फिरवला झाला मोकळा. तुला सांगते, माझे आणि नंदाताईचे असे दाट, काळेभोर आणि लांबसडक केस होते. आमच्या घरात तीसएक  माणसं. आईच वेणी घालायला हवी असं नव्हतंच. आजी, आत्या, काकू, चुलत, मावस बहिणी, मावशी नाही तर शेजारपाजारच्या कोणीही घालायचं वेण्या. केसातला गुंता काढून नीट िवचरून लांबसडक दोन वेण्या रिबीन लावून वर बांधेपर्यंत प्रत्येक जण काहीतरी बोलत राहायची. अगं, तिथंच शिकले मी गुंता सोडवायला. दोष तुमचा नाही. परिस्थितीचा आहे. राहावं लागतं काळाप्रमाणे. आज कळलं तुला थोडंफार तरी. आणि हे बघ, लोकरीला ऊब असतेच. तशीच ऊब आयुष्यभर मिळावी लागते, तीसुद्धा प्रत्येक नात्याची. उबेचा आब असतो वेगवेगळा. जाणवत असतो आपल्याला. माया, ममता, वात्सल्य, प्रेम, मत्री, आपलेपणा ही रूपं उबेची. उबदार नाती असली की सकस वाढ होते. प्रयत्न कर, जमेल गुंता सोडवायला. छटा बघितल्यास या लोकरीतील एकाच रंगाच्या. नात्यातील भावनांनादेखील असतात रंगछटा. स्वभावातली कुठली छटा कधी चमकेल सांगता येत नाही. ती छटा म्हणजे तो संपूर्ण माणूस नसतो. आपल्यालाच घाई होते आणि ती छटा, तो विचार, ती कृती त्या व्यक्तीशी पक्क्या धरून बसतो. एक मत मनात तयार केलं जातं त्या व्यक्तीबद्दल आणि मग गरसमजांचं पेव फुटतं. तसं होऊ द्यायचं नाही. यालाच म्हणतात जरा वाव देणं, स्पेस देणं. घाईघाई करून कुठं जायचं असतं आपल्याला. नाहीतर होतेच ताणाताणी. हीच कसोटी असते झेलणाऱ्याची. उतरायचं असतं अशा कसोटीमधून. सिद्ध करायचं स्वत:ला. त्या वेळी मिळणारा स्वान्तसुखाय आनंद अनुभवणं स्वर्गसुखापेक्षा मोलाचं असतं. इथूनपुढे तुलाही प्रचीती येईल. आलेली प्रचीती तुझी जीवनतत्त्वं होतील, तुझी स्टाइल होईल. कारण सांगू, आता आमची सीमा लोकरीचा गुंता सोडवायला शिकली. कसं सांभाळून वागायचं तिला आता जमणार आहे. आपण एकटे थोडेच राहतो, आपल्यालाही सांभाळून घेणारी आपली माणसं आहेत. आपणसुद्धा असतो एक छोटासा धागा त्या गुंत्यामधला. आपलेच लोक गुंता सोडवून घेतात आपल्यालाही जवळ!    

Loksatta lokshivar Agriculture Business Milk business animal husbandry
शेती नसणाऱ्याची धवलक्रांती!
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
Holi 2024
Holi 2024: गोऱ्यांनाही पडली होती भारतीय रंगांची भुरळ; युरोपियन पाहुण्यांनी होळीचे दस्तऐवजीकरण कसे केले?