आपल्या देशात प्रत्येक मैलावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. अनेकदा दोन भाषांची सरमिसळ होऊन वेगळीच बोलीभाषा तयार होते. मात्र नवख्या माणसाला ती अनेकदा कळत नाही आणि मग त्यातून गमतीशीर प्रसंग उद्भवतात. तसाच हा मध्य प्रदेशातल्या इंदोरच्या सूनबाईंना आलेला हिंदीमिश्रित मराठीचा अनुभव…
सध्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासूनच मुलांना हिंदी, मराठी, इंग्रजी या तीन भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावर बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यातल्या हिंदी भाषेच्या सक्तीवर तर आपल्याकडे अनेकांचा आक्षेप आहे, पण माझ्या आयुष्यात मात्र हिंदी-मराठी या भाषेच्या सरमिसळीने फारच गंमत आणली.
खरं तर पुस्तकातली प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यात कायमच फरक असतो. मध्य प्रदेशात स्थायिक झालेल्या आणि तिथल्या शाळेत मराठी विषय शिकलेल्या माझ्या आप्तांची बोलीभाषा ऐकताना हा फरक ठळकपणे जाणवतो. कारण तिथल्या प्रादेशिक भाषेची म्हणजेच हिंदीची नकळतपणे छाप मराठी भाषेवर पडल्यामुळे वेगळीच मराठी बोलीभाषा कानावर पडते आणि हळूहळू आवडायलाही लागते. त्रिभाषेच्या गरमागरम चर्चेच्या निमित्ताने अशा वेगळ्याच हिंदीमिश्रित मराठी भाषेशी जमवून घेतानाचे काही प्रसंग आठवले की आजही गंमत वाटते.
माझ्या मुंबईस्थित नवऱ्याचा सर्व परिवार मूळचा इंदोरचा. त्यामुळे नातेवाईक एकत्र जमले की बहुतेक गप्पा हिंदीमिश्रित मराठीतून होतात. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात तिथे गेल्यावर ऐकलेल्या काही शब्दांनी मला कधी प्रचंड दुखावलं तर कधी गोंधळात टाकलं. उदाहरणच द्यायचं तर मला पहिल्यांदा बघितल्यावर आजेसासूबाईंच्या ‘‘शांते, अगदी दुबळी आहे गं तुझी सून.’’ या शेऱ्याने मी अगदी खंतावलेच. ‘‘दोन मिनिटांत यांना कुठे जाणवला माझा दुबळेपणा?’’ याचा विचार करत बसले. पण नवखी असल्यानं उलट विचारायची प्राज्ञा नव्हतीच. दुपारी जेवताना कुणाच्यातरी आजारपणाचा विषय निघाला तेव्हा ‘ती आडदांड व्यक्ती खूपच दुबळी झालीय,’ असं आजेसासूबाई आजेसासऱ्यांना सांगू लागल्या तेव्हा समजलं की त्यांच्या दृष्टीने दुबळे म्हणजे बारीक. म्हणजे त्याअर्थाने त्या मला दुबली, पतली, सडसडीत म्हणाल्या होत्या.(म्हणजे ती कॉम्प्लिमेंट होती तर) मराठीत मात्र दुबळ्या शब्दाला न्यूनतेची छटा असल्याने उलगडा झाल्यावर मनातील बोच बोथटली.
त्यापुढची गंमत म्हणजे मला दुबळी म्हणणाऱ्या आजेसासूबाई माझ्या सिफॉन साडीला, ‘अगदीच बारीक आहे गं ही साडी’ असं म्हणाल्या तेव्हा पुन्हा माझा गोंधळ. नक्की बारीक कोण? मी बारीक? की साडी बारीक?’’ पण इथं त्यांच्या बारीक शब्दाचा अर्थ झिरझिरीत, पारदर्शक असा होता. दुपारी पत्ते चॅलेंज खेळताना १५ वर्षांचा पुतण्या पटकन म्हणाला, ‘‘अरे यार काकी, तुम्ही खूप बदमाशी करताय हा, मुश्कील आहे तुमच्याबरोबर खेळणं.’’ त्याने सर्वांसमोर मला बदमाश म्हटल्यावर माझ्या डोळ्यात पाणी यायचंच बाकी होतं. वाटलं, संस्थानी रिवाजाच्या या शहरात मोठ्यांप्रति आदर वगैरे काहीच नाही की काय? काकीला यार आणि चक्क बदमाश म्हणतो? आणि कुणी त्याला दटावतही नाही? खेळाचा मूडच गेला माझा. पण पुढच्याच २-४ डावांत एकमेकांवर ‘बदमाशी’ शब्दाची आतषबाजी चाललेली पाहून ‘बदमाशी’ हा शब्द आपल्या मराठीतील शिवीसदृश नाही तर लबाडी, फसवणूकला समानार्थी असल्याचं जाणवलं आणि आपल्या अरे किंवा अगं ऐवजी यार हे संबोधन सर्रास कुणालाही वापरतात, याची मनाशी नोंद घेतली.
इतक्यात सासूबाईंचा आवाज आला, ‘‘अरे किती कल्ला करून राहिले रे तुम्ही? थोडा वेळ पत्ते थांबवून द्या आणि गरमागरम चहा पिऊन घ्या नाहीतर थंड होऊन जाईले.’’ अरे बापरे, करून राहणे, थांबवून देणे, पिऊन घेणे सासूबाईंच्या एकेका वाक्यात दोन दोन क्रियापदांच्या वापर ऐकल्यावर बोलण्यावरचा हिंदी भाषेचा प्रभाव स्वच्छपणे जाणवला. जसं की, कर लो, पि लो, खा लो वगैरे. तसाच प्रकार, काय करतेस, जातेसच्या ऐवजी काय करती, बोलती, जाती वगैरे क्रियापद वापरातसुद्धा जाणवतो. शिवाय आपल्या नागपूर वऱ्हाडी भाषेसारखंच ती/तो जाईल, करील, देईन अशा क्रियापदांच्या वापराऐवजी जाईले, करीले, देईने अशा एकारांत पद्धतीने होतं ते. अनेक गोष्टींमध्ये हिंदी प्रभावाखालचे लिंगबदल ऐकले की माझ्या शुद्ध मराठी व्याकरणावर कुणीतरी बोळा फिरवल्यासारखं वाटायचं. कारण इकडे हिंदीतील स्त्रीलिंगी घडीचं मराठीत तो घड्याळ होतं. एकवेळ ते समजून घेऊ पण ‘ते शर्ट’ आणि ‘तो पँट’ म्हणण्याचं कारण अजूनही समजलेलं नाही.
स्वयंपाकघरातल्या अनेक शब्दांनी मी अशीच गोंधळून गेले होते. एकदा घरात पूजा होती म्हणून आदल्या दिवशी सासूबाई म्हणाल्या, ‘‘उद्या सकाळी खूप घांदे असतील तेव्हा आजच माळ्यावरची मोठी भगुणी काढून ठेवूया.’’ पण भगुणीचा अर्थच माहीत नसल्याने माळ्यावरून नक्की काय काढायचं ते समजेना. म्हणून मी गोंधळून माळ्याकडे बघत उभी राहिले तर त्या मला म्हणाल्या, ‘‘अगं अशी काय करती? मला इथून दिसून राहिली आणि तुला कशी दिसून नाही राहिली? एकातएक पितळेची चांगली ४ भगुणी आहेत बघ ठोक्याची. बाकी अटाळ्याकडे आत्ता बघू नकोस.’’ तेव्हा कुठे माझ्या मराठी टू मराठी शब्दकोषात भगुणे म्हणजे पातेले, अटाळा म्हणजे पसारा आणि घांदे म्हणजे गोंधळ या नवीन शब्दांची भर पडली. तेवढ्यात दिवाळीपूर्वी घर पोतायचे असं वाक्य ऐकल्यावर म्हणजे नक्की काय करायचं? या विचारात पडले पण पुढच्याच क्षणी यावेळी आपण सर्व खोल्यांना एकच म्हणजे क्रीम किंवा बेज कलर लावूया अशी चर्चा ऐकल्यावर पोतणे म्हणजे रंगवणे या आणखी एका शब्दांची भर पडली.
एकीकडे अशी शब्दसंपत्ती वाढवत असताना मला कधीतरी दुभाषाची अवघड भूमिकाही करावी लागे. माझी आई आणि सासूबाई आमनेसामने आल्या की त्यांच्या गप्पांमध्ये एकमेकींना समजून सांगण्याची माझी भूमिका महत्त्वाची असे. एकदा सासूबाई म्हणाल्या, ‘‘आजकाल संध्याकाळी बाजारात खूप भीड असते म्हणून बाहेर जाणं नको वाटतं.’’ मग त्या भीडमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आईला बरंच काही सांगू लागल्या. आईला आधीच हिंदी समजण्याची मारामार. आजवर मराठीशिवाय कुठलीही भाषा कानावर न पडलेल्या आईच्या मते भीड म्हणजे संकोच त्यामुळे अर्थातच तिचा गोंधळ उडाला आणि तिने हळूच मला कानात विचारलं, ‘‘संध्याकाळी बाजारात भीड कशाला वाटते गं त्यांना?’’ तेव्हा ‘‘भीडचा अर्थ गर्दी, तू समजतेस तसा संकोच नाही. तिथल्या गर्दीचा त्यांना त्रास होतो,’’ असं समजावल्यावर तिला उलगडा होतोय न होतोय तोवर ‘‘शिवाय आजकाल सर्दीमुळे अंधार लवकर पडतो.’’ या सासूबाईंच्या विधानावर पुन्हा आईच्या चेहऱ्यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह. सर्दीपडशाचा आणि अंधार होण्याचा काय संबंध? हा तिचा प्रश्न. तेव्हा ‘‘गर्मी म्हणजे उन्हाळा आणि सर्दी म्हणजे हिवाळा,’’ असं सांगून माझी दुभाषाची भूमिका मी चोख बजावली.
मध्यंतरी आपल्याकडे उर्दू भाषेबाबतही काही उलटसुलट चर्चा चालू होती, पण इथल्या हिंदीमिश्रित मराठी भाषिकांच्या बोलण्यात उर्दू शब्दही दुधात साखर विरघळल्याप्रमाणे मिसळून गेलेत. मी आजारी असताना सासऱ्यांनी मला ‘‘उगाचच हायतोबा करू नको.’’ सांगितल्यावर ‘हायतोबा’ शब्दाशी माझी गाडी अडली. क्षणभर तो शब्द मराठीतल्या आयतोबाचा भाऊ वाटल्यावर त्यांना काय बरं सुचवायचयं असेल असं वाटलं पण नंतर समजलं ते असं की, हायतोबा म्हणजे हाय हाय तोबा तोबा अशा उर्दूमिश्रित हिंदीतील तो वाक्प्रचार सदृश्य शब्द, अर्थात लगबग धावपळ. मी आजारी असल्याने ती करू नये असे त्यांना सुचवायचं होतं. त्यांच्या बोलण्यातल्या संस्थानिकी पगड्यावरून झालेली माझी फजिती आठवली. लग्नाला जेमतेम २ महिने झाले असावेत. मी सोडून घरातले सगळे बाहेर निघाले होते. जाता जाता सासऱ्यांनी दाराशी माघारी येऊन, ‘‘कुणीही रईसी आला तरी शक्यतो घरात घेऊ नकोस. फक्त निरोप घे.’’ असं बहुतेक काळजीपोटी बजावलं. मी मान डोलावली. रात्री सगळे घरी आल्यावर त्यांना ‘‘तुमचे ते कुणी रईस आलेच नाहीत बरं का.’’ असं सांगितल्यावर सगळे हसायलाच लागले. यात हसण्यासारखं काय मला समजेना तेव्हा रईस नावाची कुणी व्यक्ती नाही तर रईसचा अर्थ खास मातब्बर श्रीमंत असामी. थोडक्यात, मी ओळखत नसलेल्या कुणाही व्यक्तीला सावधगिरीच्या दृष्टीने घरात घेऊ नये मग ती कितीही बडी असामी असली तरीही, असा त्यांच्या सल्ल्याचा अर्थ होता. कदाचित तिथल्या संस्थानी पार्श्वभूमीमुळे नबाबजादा, रईस वगैरे शब्दांचा वापर त्यांच्याकडून बरेचदा होत असे.
एकदा माझी मुलगी आणि तिची मैत्रीण परीक्षेला निघाल्या. जाताना त्या दोघींनी सासऱ्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी उर्दू-अरबी-हिंदी कडबोळ्यातून ‘फत्तेह’ म्हणत हात उंचावला. त्यावेळी टी.व्ही.वर कुणाची तरी स्वातंत्र्यलढ्यावरची मालिका चालू होती ज्यातील क्रांतिकारक मोहिमेवर निघताना एकमेकांना ‘फत्तेह फत्तेह’ म्हणून शुभेच्छा देत त्यावरून मैत्रिणीने सासऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरवून टाकलं कारण त्यांनीही ‘यशस्वी व्हा’ वगैरे आशीर्वाद न देता त्यांच्या सवयीनुसार ‘फत्तेह’ म्हटलं होतं. मुलीकडून तिचं ते तर्कशास्त्र ऐकल्यानंतर पुढे कित्येक दिवस तो आमच्याकडे चेष्टेचा विषय झाला होता. गंमत म्हणजे तेव्हापासून आम्हीही एकमेकांना शुभेच्छा देताना ‘फत्तेह’ असा परवलीचा शब्द म्हणून डोळे मिचकावतो.
alaknanda263@yahoo.com