‘विकिपीडिया’नुसार हौशी रंगभूमी म्हणजे त्यात सहभागी असणारे पैशांसाठी नाही तर स्वत:च्या आनंदासाठी त्यात सामील होत असतात. भारतामधील नाटकवाल्यांसाठी हौशी रंगभूमी ही आपल्या नीरस जीवनात अर्थ आणि रंग भरणारी एक शाळा, प्रयोगशाळा आणि पवित्र स्थळ होते आणि अजूनही आहे. रत्ना यांच्या दृष्टीने या रंगभूमीमुळे त्यांचे डोळे आणि मनाचे दरवाजे उघडले, केवळ नाट्यविषयक गोष्टींसाठीच नव्हे तर जगण्याच्या व विचार करण्याच्या नवीन शक्यतांमुळेही. याच रंगभूमीमुळे त्यांचे त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांशी आणि कुटुंबाशीही घट्ट धागे जुळले आणि त्यांना स्वत:ला अधिक संपन्न बनवण्याची संधी मिळाली.

‘आविष्कार’च्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ मध्ये सुलभा देशपांडे आणि इतर कलाकार‘थिएटर युनिट’ची निर्मिती असलेल्या बादल सरकार यांच्या ‘एवम् इंद्रजित’ नाटकात सत्यदेव दुबे आणि अमरिशपुरी ही मुंबईतील हौशी रंगभूमीची कहाणी आहे – मला साधारण गेल्या ५० वर्षांमध्ये हौशी रंगभूमीवरील अनेक नाटक कंपन्यांची गुणवत्तापूर्ण वाढ झाल्याचे पाहण्याचे भाग्य लाभले आहे. अनेक भाषांमध्ये, अनेक ठिकाणी, राज्य व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये, क्वचितच एखाद्या सरकारी संस्थेच्या मदतीने, जगण्याच्या धावपळीतून वेळ काढणारे, आर्थिक चणचण असलेले हे नाटकवाले आज भरभराटीला आले आहेत आणि त्यांनी आपले शहर व आपल्या देशाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे.

दिवसभर उदरनिर्वाहासाठी कष्ट केल्यानंतर संध्याकाळी तालमी केल्या जात असल्याचे मी संपूर्ण आयुष्यभर पाहात आले आहे. खरं तर, ‘एनएसडी’मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा संपूर्ण दिवसभराची तालीम पाहिली तेव्हा आश्चर्याने थक्क झाले होते. मुंबईत प्रत्येकाला दिवसभराची नोकरी असे; बँका अनेक कलाकारांना नोकरीच्या माध्यमातून पाठिंबा देत असत जेणेकरून बँकांनाही विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे. याशिवाय अनेक जण डॉक्टर होते किंवा अन्य व्यवसाय करत होते. प्रत्येकाकडेच काही तरी करून दाखवण्याची सर्जनशील वृत्ती होती, आयुष्याला अर्थ देण्याची प्रेरणा होती. ‘मोटली’मध्येही आमचा तोच अनुभव होता; आमच्या सुरुवातीच्या सदस्यांमध्ये अनेक काम करणारे होते, व्यावसायिक होते – वकील, नगररचनाकार, वास्तुविशारद, अर्थतज्ज्ञ, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रमुख अधिकारी, धडपडणारे अभिनेते, गृहिणी, एखाददोन शिक्षक. हौशी रंगभूमीने आमच्यापैकी अनेकांना आपापल्या आयुष्यात रंग भरण्याचा मार्ग दाखवला. तो एक खुला, सगळ्यांचे स्वागत करणारा मंच आहे, ज्या कुणाला रंगमंचावर काही वेगळं करायची इच्छा होती, अशा मित्रांनाही तिथे काम करण्याची संधी मिळत होती.

त्यावेळी नाट्यगृहे कमी आणि महाग होती (आणि आता तर ती परवडेनाशीच झाली असल्याने तेथे काम करणं कठीण झालं आहे), पण त्याचमुळे प्रत्येकाच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला. लोक सादरीकरणात नवनवीन कल्पना आणू लागले, वेगवेगळे प्रयोग करू लागले. त्यातूनच प्रायोगिक रंगभूमीवर छोटे-मोठेे अनेक गट तयार झाले, ‘रंगायन’चे डॉ. श्रीराम लागू आणि विजया मेहता, ‘थिएटर ग्रुप’चे इब्राहिम अल्काझी, जेर्सन दा कुन्हा, डेरेक जेफरीज, पदमसी बंधू, ‘थिएटर युनिट’चे सत्यदेव दुबे, ‘आविष्कार’ व ‘छबिलदास शाळे’चे सुलभा व अरविंद देशपांडे तसेच अरुण काकडेकाका आणि नंतर अर्थातच ‘पृथ्वी’चे जेनिफर आणि शशी कपूर असे अनेक दिग्गज रंगभूमीसाठी प्रेरक शक्ती होते. या सगळ्यांचे काम आमच्या समोर होते, त्याच मुळे नवीन आणि वेगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. पैसे कमी होते, पण कल्पना भरपूर होत्या, त्या काळात मुंबईमध्ये सगळ्याच भाषांमध्ये नवनवीन विषयांवर काम करण्याचा आत्मविश्वास सर्वत्र दिसून येत होता.

आज गोष्टी नि:संशयपणे भिन्न आहेत (नाटकाकडे अनेकदा इतर गोष्टींसाठी पायरीचा पहिला दगड म्हणून पाहिले जाते), पण तरीही मला भेटणाऱ्या अनेक तरुण व्यावसायिकांच्या डोळ्यात अभिव्यक्तीच्या अनावर इच्छेची चमक अजूनही दिसते. मुंबईव्यतिरिक्त पुणे, जळगाव, जालना, अकोला, बेंगळूरु, चेन्नई अशा शहरांमधून आपली नाटके घेऊन येणाऱ्या नाट्यगटांमध्ये हाच उत्साह दिसतो, पण एक गोष्ट मला खटकते. विषय नवीन असू शकतात आणि तंत्र कल्पक असू शकते, पण मी अभिनयाच्या दर्जाने निराश होते. या नाटकांमधले अगदी तरुण अभिनेतेही निष्प्राण आणि स्टीरिओ टीपिकल, ठरावीक रूढीवादी शैलीला चिकटलेले असतात. मी जेव्हा एखादं नाटक पाहते तेव्हा मी चकित व्हावं, अस्वस्थ व्हावं, हादरून जावं, किंवा माझं भावविश्व ढवळून जावं अशी माझी अपेक्षा असते, ते फक्त मनोरंजनात्मक नसावं; आणि ते पाहून चिडचिड तर मुळीच होता कामा नये.

अर्थात कधी कधी जादू घडते. नव्या पद्धतीने विचार करणारी, माझ्यात खळबळ निर्माण होईल अशी नाटके मला पाहायला मिळतात – ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘हॅम्लेट – द क्लाऊन प्रिन्स’,‘पिया बहुरूपिया’, ‘जो डूबा सो पार’, ‘संगीत बारी’, ‘देअर इज समथिंग इन द वॉटर’, ही मी गेल्या काही वर्षांत पाहिलेली आणि मला आनंद देऊन गेलेली नाटके आहेत.

या प्रकारची नाटके करणे किती आव्हानात्मक आहे हे पाहता, हौशी रंगभूमीचा इतका काळ उत्कर्ष होत राहिला आहे ही जादूच आहे. शक्य तितके वेगळ्या टोकाला जाऊन प्रयोग करणाऱ्या तरुण, उत्सुक आणि निडर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांनी दशकामागून दशके ही जादू शक्य केली आहे. यामुळे अर्थातच महाराष्ट्रात, देशभरातील लहान शहरांपासून ते मोठ्या महानगरांपर्यंतही एक चैतन्यशील नाट्यपरंपरा निर्माण झाली आहे. ही भारताचे त्याच्या अगणित मन:स्थितीसह प्रतिबिंब दाखवणारी एक परंपरा आहे; माझी आई आणि तिचे समकालीन ६०च्या दशकात, खरे भारतीय नाटक कसे दिसेल याची चर्चा करत असताना ज्याची कल्पना करत असत, ती ही परंपरा आहे.

या रंगभूमीने आपल्याला विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, धर्मवीर भारती, मोहन राकेश, सतीश आळेकर, गुजराती लेखक मधु राय आणि यांच्यासारखे इतर अनेक नावीन्यपूर्ण लेखक दिले आहेत. त्यांनी नाट्यस्वरूप आणि आशय याचा धांडोळा घेण्याची चालना दिली आहे; त्यांनी कोणत्याही आर्थिक लाभांशिवाय त्यांच्या कलेचे प्रयोग केले आहेत; त्यांना कठोर टीका आणि सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला आहे; त्यांनी रस्त्यांवर, न्यायालयात आणि रंगमंचांवर लढे दिले आहेत. त्यांनी, सफदर हाश्मीप्रमाणे, वास्तवाकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत करण्यासाठी आपले प्राणही दिले आहेत. त्या सगळ्यांनीच आम्हाला या जिवंत, वाढत्या परंपरेच्या अभिमानाचा वारसा दिला आहे.

मुंबईमध्ये हौशी रंगभूमी जोमाने सुरू आहे कारण ती एक गरज भागवते; ती या क्षेत्रात नवीन कल्पना, संवादाचे नवीन मार्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन लोकांना घेऊन येते. ही अशी एक जागा आहे जिथे जोखमी पत्करता येतात, आणि त्याही आत्मविश्वासाने. ‘मोटली’मध्ये आमच्यासाठी, ते आम्हाला ‘डॉन जुआन इन हेल’, ‘द केन म्युटिनी कोर्ट-मार्शल’ आणि ‘अँटिगनी’ यासारख्या नाटकांपासून पुढे, शेवटी स्टोरी टेलिंग अर्थात कथाकथनाकडे घेऊन गेले, जो साधा सरळ आणि आदी प्राचीन प्रकार आहे. त्यासाठी पैशांची नव्हे तर कल्पनाशक्तीची आवश्यकता असते.

पैशांच्या मागणीपासून मुक्तता म्हणजे शब्दबंबाळ सादरीकरण करण्यापेक्षा आम्हाला संवादावर लक्ष केंद्रित करता येत होते. याचा असाही अर्थ होता की, आम्हाला बराच वेळ नाटकाबरोबर राहता येत होते, तालमीदरम्यान आणि प्रयोग सादर करतानाही. मी ब्रिटनमधील ‘लेस्टर हेमार्केट थिएटर’साठी गिरीश कर्नाडच्या ‘बली’साठी (बळी) काम केले तेव्हा मला याचे मोल समजले. मी तेव्हा प्रथमच इंग्रजी कंपनीबरोबर, त्यांच्या नियमित निर्मिती शैलीमध्ये, काम करत होते – सहा आठवड्यांची तालीम, तीन आठवडे नाटकांचे प्रयोग, दर बुधवारी व शनिवारी दोन प्रयोग आणि सोमवारी आठवडी सुट्टी. इतके ‘नियमित नोकरी’सारखे काम मी कधीच केले नव्हते; त्यामध्ये मी अगदीच असमाधानी होते. आम्ही केवळ निर्मितीवरच लक्ष केंद्रित केले होते. त्यामध्ये फारसा आनंद मिळत नव्हता कारण आम्ही जे काही सादर करत होतो ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हतं, त्यामुळे लोकांनाही ते पाहाण्यात इंटरेस्ट नव्हता आणि आम्हालाही नव्हता; ते मात्र एक्झॉटिक होते – त्यातून ओळखीची कोणतीही झलक दिसत नव्हती. ते एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासारखे होते. मला नेहमीच असं वाटत आलं आहे की नाटक करण्याची तुलना लग्नाशी होऊ शकते – तुम्ही दीर्घकाळ कटिबद्ध असता; चित्रपट एखाद्या प्रेम प्रकरणासारखं असतं – उत्कट, रोमांचक पण तात्पुरतं.

जेव्हा लोक म्हणतात, आपल्याकडे इथे भारतात ब्रॉडवे/वेस्ट एंड शैलीतील सादरीकरण का नाही होऊ शकत? तेव्हा मी खूप गोंधळते. मी त्यांना सांगते की, आपल्याकडे त्या पायाभूत सुविधा नाहीत – आपण नाटकाचा प्रत्येक प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या रंगमंचावर सादर करतो. एकाच थिएटरमध्ये एकाच नाटकाचे दीर्घ काळ प्रयोग करण्याची कल्पना आपल्याकडे जवळजवळ अशक्य आहे. आपण एका तासात किंवा कधी कधी त्याहीपेक्षा कमी वेळांत सेट उभारतो; प्रकाशयोजना अगदी गरजेपुरती असते आणि गुंतागुंतीचे संच कौशल्याने उभारणे कठीण असते. दुसरा प्रयोग करायला कधी मिळेल किंवा मिळेल की नाही हे आपल्याला आधी माहीत नसतं; आपण अशक्य परिस्थितीत प्रवास करतो आणि अभिनेते व अन्य सहकाऱ्यांना जेमतेम रोजची बिदागी देतो. आपण कमीत कमी निधीमध्ये काम करतो, त्यापैकी कोणतेही पैसे सरकारकडून मिळत नाहीत, जसे ब्रिटनमधील ‘आर्टस् कॉन्सिल- ललित कलांना निधीपुरवठा करते. आपल्या प्रयोगकर्त्यांना क्वचितच औपचारिक प्रशिक्षण मिळते – प्रत्येक जण काम करताना शिकतो. आमच्याकडे नेहमी पैशांची चणचण असते आणि वेळ, जागा व साधनसामग्री कमी असते. पण जेव्हा मी लंडनमधील ‘वेस्ट एंड’मध्ये थकल्याभागल्या सांगीतिका पाहते, किंवा ‘ब्रॉडवे’मध्ये आशयघनता नसलेलं, बडेजाव मिरवणारं सादरीकरण पाहते, आणि त्याहून वाईट, येथे भारतात त्याची वाईट नक्कल पाहते, तेव्हा वाटतं, आम्ही हौशी नाटकवाले अधिक प्रामाणिक आहोत. आम्ही शोध घेतो, आम्ही जोखमी घेतो, आम्ही नवनिर्मिती करतो.

आम्ही भविष्य घडवतो!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com