आजी म्हणाली, ‘‘अगं, आपण आतून मनानं प्रसन्न असलं तर चेहऱ्यावर आपसूकच ती प्रसन्नता दिसते. मन आपलं आहे. मग त्याच्यापर्यंत काय न्यायचं आणि काय नाही हे आपल्याच हातात असायला हवं.’’ या दोन वाक्यांत आजी खूप काही सांगून गेली. किती बरोबर होतं ते. इतका साधा सरळ विचार कधी केलाच नव्हता.
‘‘आदित्य, निबंध झाला का लिहून? पुढच्या आठवडय़ात वही द्यायची आहे ना, चला बसा आता. काय लिहायचं आहे, ठरला का विषय?’’ एकीकडे मटार सोलता सोलता मी आदित्यला सूचना देत होते. सध्या सुट्टी सुरू होती. तरी स्वारी खाली खेळायला न जाता घरीच होती. हातातलं काम आटोपून मी बाहेर आले, तर आदित्य वही घेऊन लिहायला बसतच होता. तो म्हणाला, ‘‘आई, मी पणजी आजीबद्दल लिहिणार आहे. ‘माझी पणजी आजी’.’’ ‘‘अरे वा! एकदम पणजी आजी कशी आठवली आज?’’ मला जरा कुतूहल वाटलं. ‘‘‘पहिली जंगल सफारी’, ‘आवडता सण दिवाळी’, ‘माझे स्वप्न’ या विषयांवरून आज गाडी पणजी आजीकडे कशी काय वळली?’’ ‘‘अगं आई, माझ्या वर्गात मी सोडून कोणाकडेच नाहीये पणजी आजी,’’ असं आदित्यने म्हणताच डोळ्यात टचकन पाणी आलं. ‘‘हो रे, खरंच नशीबवान आहेस तू,’’ असं म्हणत मी त्याच्या पाठीवर हात ठेवला. आदित्य उत्साहाने आपल्या पणजी आजीबद्दल लिहू लागला.
‘पणजी आजी’ या नावातच किती गोडवा आहे आणि तिचं प्रेम मिळणं म्हणजे खरं तर भाग्यच. ही पणजी आजी आहेपण खूप ‘स्पेशल’, १०२ वर्षांची, वयाच्या ६० व्या वर्षी सायकल शिकलेली, तीस वर्षांपूर्वी सोलर कुकरवर स्वयंपाक करणारी, आजच्या जमान्यात स्काइप करणारी आणि सेल्फीसुद्धा काढणारी. पणजी आजीची अनेक रूपं एका क्षणात डोळ्यांसमोर आली.
माझं लग्न ठरलं तेव्हा अठरा वर्षांपूर्वी प्रथम मी तिला पाहिलं. आजीचं सुख तसं कमीच मिळालं होतं. त्यामुळे नकळत कुठे तरी तिची ओढ वाटू लागली. हळूहळू सहवास वाढला आणि ‘अहो आजी’ची ‘अगं आजी’ झाली. आजेसासुबाई असूनही माझ्याकरिता मात्र ती आजीच होती. चैतन्य, समाधान, उत्साह, आपुलकीने काठोकाठ भरलेली; मुलं, सुना, नातवंडं, पतवंडं, नातसुनांमध्ये रमणारी; घराचं ‘वैभव’ असलेली आजी!!
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून सरळ आजीकडे गेले. ‘‘आज रविवार नाही मग कशी आलीस?’’ हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. ‘‘आजी, तुझी आठवण आली म्हणून आले.’’ असं म्हणताच ती हसली. ‘‘ऑफिसमधून परस्पर आलीस ना, चल मस्त कॉफी बनवते तुझ्यासाठी,’’ असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. एक क्षण इतकं छान वाटलं असे लाड करून घ्यायला, पण दुसऱ्याच क्षणी, ‘‘मी करते कॉफी आजी, तू बस,’’ असं म्हणत मी आत गेले; पण शेवटी कॉफी तिनेच केली. ‘‘आज इतकी दमल्यासारखी का दिसते आहेस?’’ आजीच्या या प्रश्नाला ‘‘हो गं, खरंच दमले आहे,’’ असं प्रामाणिक उत्तर द्यावं की तिच्या या वयातल्या उत्साहाकडे पाहून ‘नाही’ म्हणावं यातच अडखळले मी. वाफाळलेली मस्त कॉफी पिताना आजीबरोबर छान गप्पा रंगल्या.
आजीकडे पाहून मला नेहमीच प्रश्न पडायचा की, आजी इतकी खूश, सतत उत्साही कशी राहू शकते? मनात आलेला हा साधा सोपा प्रश्न मी अगदी सहजपणे आज तिला विचारला.
आजी म्हणाली, ‘‘अगं, आपण आतून मनानं प्रसन्न असलं तर चेहऱ्यावर आपसूकच ती प्रसन्नता दिसते. मन आपलं आहे. मग त्याच्यापर्यंत काय न्यायचं आणि काय नाही हे आपल्याच हातात असायला हवं.’’ या दोन वाक्यांत आजी खूप काही सांगून गेली. किती बरोबर होतं ते. इतका साधा सरळ विचार कधी केलाच नव्हता.
आजीशी बोलताना नेहमी जाणवायचं की,लहानसहान गोष्टींत किती आनंद शोधते ती. आपल्यासारखेच तिच्यासाठीसुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत, तरी गोळा करायला क्षण मात्र बरेच आहेत. आपणही तसंच जगलं पाहिजे..