अंजन घालणारा

निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी विनोदी पद्धतीनं लिहिलेला, पण डोळे ओले करणारा ‘विधवा म्हणजे काय?’ हा लेख (२९ एप्रिल) मनाला स्पर्शून गेला. त्यांनी या लेखातून डोळय़ांत अंजन घातलं आहे. खरंच आजच्या काळात सुशिक्षित असूनही ‘गं.भा.’ लिहून स्त्रीच्या वैधव्याची खूण अधोरेखित करत तिला किती वर्षे मागे नेणार? तिचा काही दोष नसताना! आज आपण सुधारल्याचा वरकरणी मुलामा देत जगत असतो, पण काही प्रसंगी असे मागास विचार मनात आणून नकळतपणे व्यक्तीस दुखावत असतो. ‘सौ.’ ही नावापुढची खूणही जाते, तेव्हा किती वेदना होतात. त्यापेक्षा इंग्रजीत लिहिताना नमूद करतात, तसं ‘श्रीमती’ बरं सगळय़ांसाठी.

– सुषमा शिरीष शेटे

‘नव्वद टक्क्यांचा सापळा’ पालकांनी लक्षात घ्यावा

‘नव्वद टक्क्यांचा सापळा’ हा डॉ. अंजली जोशी यांचा ‘वळणबिंदू’ सदरातील लेख (२२ एप्रिल) वाचला. बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा व त्यात जास्त मार्क मिळवण्याचा ताण, यासंदर्भात एका विद्यार्थ्यांचं मनोगत त्यात आलं आहे. मेरिट लिस्ट, नव्वद टक्के, चांगल्या कोर्सला प्रवेश, या गोष्टींना अलीकडे प्रचंड महत्त्व आलं असून यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना किती मानसिक ताण येतो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महागडे क्लास, अभ्यासाचं महागडं साहित्य, या गोष्टी प्रसंगी घरात काटकसर करून दिल्या जातात. परंतु विद्यार्थाना नेमकं कोणतं शिक्षण घ्यायचं आहे हे विचारलं जातं का? चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा पैसे देणारा व्यवसाय असावा यासाठी शिक्षण घ्यायचं, हाच विचार रूढ झाला आहे. मुलामुलींना त्यांची पात्रता व शैक्षणिक कल ओळखून शिक्षण मिळालं तर शिक्षणाचा प्रवास आनंददायी होईल. अन्यथा सध्या काय होत आहे ते तर दिसतंच आहे.

– उमा हाडके

‘गं.भा.’ ही अनिष्ट शब्दावली नकोच

निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी लिहिलेला ‘विधवा म्हणजे काय?’ हा तिरकस शैलीतला लेख वाचला. त्यांनी या निमित्तानं ‘गं.भा.’ या उपपदाचा फोलपणा विदारकपणानं लक्षात आणून दिला आहे. उपहास अन् उपरोध या अस्त्रांचा त्यांनी विलक्षण परिणामकारक उपयोग केला आहे. वास्तविक जे उपपद विधवांच्या बाबतीत कधीही वापरायला नको, ते अधूनमधून- विशेषत: लग्नपत्रिकांमध्ये वाचावं लागलं की मन विषण्ण होतं. खरं म्हणजे ‘गं.भा.’ऐवजी ‘श्रीमती’ हा शब्द अधिक आदरदर्शक आहे. साठ-सत्तरच्या दशकात माझ्या घरी वडिलांची आई अन् आईची आई अशा दोघी आज्या विकेशा विधवा म्हणून व्रतस्थ जीवन जगत होत्या. अशा वयस्क विधवा त्या काळात तुरळक प्रमाणात अनेक ठिकाणी दिसत असत. त्यांच्या व्रतस्थ जीवनाचा आदर राखण्यासाठी ‘गंगा भागीरथी’ हे संबोधन प्रचलित होतं. त्याच काळात मी     ह. ना. आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी वाचली होती. त्यातला यमूच्या केशवपनाचा करुणास्पद प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला. आता विकेशा विधवा म्हणून कोणतीही स्त्री वावरत नाही. त्या बंद झालेल्या क्रूर रुढीप्रमाणे ‘गं. भा.’ ही अनिष्ट शब्दावली कायमची हद्दपार केली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– प्रा. विजय काचरे