२ जानेवारीला प्रसिद्ध झालेला ‘टबुली’ हा लेख आवडला. ‘मनातलं कागदावर’ या सदरात हा लेख असल्याने खुसखुशीत भाषेत लिहिलेली ही गमतीशीर गोष्ट आहे का सत्य अनुभव आहे हे कळायला मार्ग नाही. लेख वाचताना मंगला सामंत यांच्या ‘बालकप्रधान समाजाची गरज’ (१४ नोव्हेंबर, चतुरंग) या लेखाची आठवण झाली. पितृप्रधान कुटुंबसंस्थेमुळे निर्माण झालेल्या सासू-सून नात्यामधील पूर्वग्रह दूर करून उद्याची पिढी संस्कारक्षम करण्याची जबाबदारी सासर-माहेर दोन्हीकडच्या स्त्री-पुरुषांनी ठेवली पाहिजे. कारण पुन्हा मातृप्रधान कुटुंबसंस्थेकडे इतिहासाची उलटी पावले आता कधीच वळणार नाहीत. - चित्रा वैद्य, पुणे हुरहुर जाणवणार संपदा वागळे यांचा गेल्या वर्षीची ‘सत्पात्री दान’ ही लेखमाला फारच वाचनीय होती. अनेक लोकांचे समाजाप्रति केलेले दान वाचून त्यातील दीपस्तभांना अनेक प्रणाम करावासा वाटतो. डॉ. वृंदा कार्येकर यांचा ‘खेडी स्मार्ट कधी होणार’ हा लेखसुद्धा विचार करायला लावणारा आहे. काही लेखमाला संपल्याची हुरहुर जाणवणार आहे. परंतु भविष्यात आम्हाला यापुढे उत्तम वाचायला मिळेल याची खात्री आहे. - अरविंद कान्हेरे, ठाणे लेखांद्वारे समाजकार्य गेले वर्षभर संपदा वागळे यांनी प्रसिद्धीपराङ्मुख दात्यांबद्दल लेख लिहून आम्हा वाचकांना प्रेरणा दिली. त्यांची लेखमाला थांबवू नये ही विनंती. कारण ती लेखमाला एक समाजकार्यच होते. त्याचप्रमाणे अॅड. पल्लवी रेणके यांचीही लेखमाला सुरूच ठेवावी. दुर्लक्षित तळागाळातल्या भटक्या लोकांची ही दु:खं या लेखांद्वारेच लोकांना समजली. - वा.मो. बर्वे, दापोली