नीरजा

धार्मिक वातावरणात वाढलेली, स्त्री-पुरुष नात्यांविषयीच्या रूढ कल्पना बाळगणारी ‘कमळी’ जग पाहात, नवे अनुभव घेत, कधी दुखावली जात, समृद्ध आणि कणखर होत जाते. स्वत:चे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास तिच्यात येतो आणि या नव्या बळासह ती इतर पिचलेल्या स्त्रियांच्या उपयोगी पडायचं ठरवते. ‘कमळी’चा ‘कमल पाध्ये’ होण्याचा हा सर्व प्रवास कोणत्याही अभिनिवेशाशिवाय, निर्मळपणे रेखाटला आहे तो ‘बंध-अनुबंध’ या त्यांच्या आत्मकथनात. घरगुती आणि सामाजिक परिप्रेक्ष्यातही स्त्रीला स्वत:ला निरखायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक म्हणूनच वाचायलाच हवं..

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना अशा असतात, की त्या केवळ आपल्या अतिशय वैयक्तिक भावबंधांशी गुंफल्या गेलेल्या असतात. या घटना क्वचित कधी मनस्ताप देतात, तर कधी आपल्या जीवनातले अनेक एकाकी क्षण सुसह्य करून जातात. कुणाशी जिव्हाळय़ानं गप्पा मारताना अनेकदा आठवणींचे असे अनेक बंध मोकळे होतात. तरीही जीवनातल्या घटनांची केवळ नोंद करणाऱ्या पारंपरिक आत्मकथनातून स्वत:च्या मनाची संवेदनशील स्पंदनं आणि जीवनातल्या सर्व घटना अगदी प्रामाणिक मोकळेपणानं कुणी लिहू शकेल यावर कमल पाध्ये यांचा विश्वास नव्हता. कारण आत्मकथनात्मक लिखाणात पुष्कळदा निर्लेप वृत्तीपेक्षा स्वत:च्या वागण्याबोलण्याचं समर्थन होत राहातं. अर्थात ते अपरिहार्यही आहे. त्यामुळेच या दोन्ही प्रकारचं लेखन करायची कमल पाध्ये यांची इच्छा नव्हती. तरीही त्यांनी ‘बंध-अनुबंध’ हे आत्मकथन लिहिलं.

   ते लिहीलं, कारण सामाजिक कार्य करताना ‘तुम्हाला माणूस म्हणून न वागवल्यानं होणारा तुमचा मनोभंग चव्हाटय़ावरून मांडा,’ असं त्या इतर स्त्रियांना सांगत होत्या आणि स्वत: मात्र ‘आपल्या घराचा आब आपणच राखला पाहिजे’ या पारंपरिक संकेताच्या चौकटींचं पालन करत होत्या. हे अप्रामाणिकपणाचं आहे, असं सतत वाटल्यानं त्यांनी आपलं आत्मकथन लिहायला घेतलं आणि ‘बंध-अनुबंध’सारखं एक पारदर्शी आणि चिंतनशील आत्मकथन मराठी वाचकांच्या हाती पडलं. 

आपल्या समाजव्यवस्थेत स्त्री म्हणून जगताना, वाटय़ाला आलेल्या विविध भूमिका पार पाडताना जे जे प्रश्न पडत गेले, त्याविषयीचं आपलं म्हणणं त्या या आत्मकथनात मांडतातच, पण ‘स्व’पासून सुरू झालेला प्रवास आजूबाजूच्या समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांपर्यंत कसा पोहोचला हेही सांगत जातात. बाईपणाच्या कक्षा विस्तारणारा एक दीर्घ प्रवास या आत्मकथनातून त्या आपल्यासमोर उभा करतात. आपलं स्वत्व शोधताना आलेले सारे अनुभव प्रामाणिकपणे मांडताना कमल पाध्ये केवळ स्त्री-प्रश्नांच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून घेत नाहीत. प्रेम, स्नेह, वात्सल्य, राग-लोभ, अशा माणसांच्या विविध भावनिक गरजांतून निर्माण होणारे भावभावनांचे, नात्यागोत्यांच्या गुंतागुंतीचे बंध-अनुबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या या आत्मकथनात तितक्याच उत्कटतेनं उलगडतात.

मुंबईमधील रामवाडीतल्या विनायक भटजींची मुलगी ‘कमळी’ ते प्रभाकर पाध्ये यांची बायको ‘कमल प्रभाकर पाध्ये’ आणि नंतर स्वत:ला सापडल्यानंतरच्या ‘सामाजिक कार्यकर्त्यां कमल पाध्ये’ असा  दीर्घ प्रवास या आत्मकथनात अतिशय संवेदनशीलतेनं त्यांनी मांडला आहे. या प्रवासात प्रभाकर पाध्ये यांच्यासारख्या व्यासंगी, बुद्धिमान, पण थोडय़ा एककल्ली स्वभावाच्या नवऱ्याबरोबर संसार करताना आलेल्या विविध पेचप्रसंगांचं, भावनिक गुंत्याचं वर्णन त्या करतात. त्याचबरोबर पाध्यांच्या जोडीनं जगलेल्या साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक विश्वातल्या विलक्षण अनुभवांनी समृद्ध झालेल्या कमलताईही आपल्याला भेटत जातात. कधी पाध्यांच्या अनाकलनीय वागण्यामुळे, कधी एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूमुळे, तर कधी माणसांच्या आलेल्या कटू अनुभवांमुळे वेगवेगळय़ा प्रसंगांत पराभूत आणि उध्वस्त झालेल्या कमलताईंचं अतिशय तरल, पण स्वयंपूर्ण असं व्यक्तिमत्त्व या आत्मकथनातून उलगडतं.

या आत्मकथनात त्या केवळ लहानपण, तारुण्य, लग्न, संसार, मग प्रौढत्व आणि त्यात आलेले बरेवाईट अनुभव यांचंच रेखाटन करतात असं नाही, तर अगदी तथाकथित उच्चवर्णातल्या जातिभेदापासून ते स्त्री-पुरुष समानतेविषयी लोकांमध्ये असलेला दुटप्पीपणा, अशा असंख्य प्रश्नांच्या उत्तरांचा शोध त्या घेत जातात. घडलेल्या प्रत्येक घटनेकडे त्रयस्थपणे पाहातात आणि त्याविषयीचं विश्लेषण आणि चिंतन करत राहातात. असं चिंतन स्त्रियांच्या आत्मकथनात क्वचितच दिसतं.

काळबादेवी रस्त्यावर असलेल्या रामवाडीत राममंदिरात मोठी झालेली, वयाच्या नवव्या वर्षी आई गमावलेली विनायक भटजींची कमळी आत्मकथनाच्या सुरूवातीलाच या मंदिराच्या सभामंडपात येऊन बसते आणि एखादं चलतचित्र सरकत जावं तसं आजवरचं आयमुष्य ‘फ्लॅशबॅक’ पद्धतीनं तुकडय़ा-तुकडय़ांतून आपल्यासमोर घेऊन येते. त्याला सलग कालखंड आहे, पण तरीही अनेक प्रसंगांचं वर्णन करता करता कधी भूतकाळात तर कधी वर्तमानात ही कमळी शिरते आणि स्वत:कडेच पाहात राहते. त्या काळातल्या घटनांवर विचार करत राहाते, त्याच्या सर्व बाजू समजावून घेऊ पाहाते.

रामवाडीतलं सारं जगणं पारंपरिक ब्राह्मण कुटुंबातलं. कीर्तन, गाणी, व्रतवैकल्यं यांच्या धबडग्यात बालपण गेलं. पण लहानपणापासूनच साऱ्याच गोष्टींचे संदर्भ तपासून पाहात, त्यावर विचार करणाऱ्या कमलताईंना स्वत:ची अशी एक समज होतीच. त्यात प्रभाकर पाध्ये यांच्याशी झालेल्या लग्नानंतर वाढलेला साहित्यिक, वैचारिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला वावर त्यांना जास्तीत जास्त प्रगल्भ आणि चिंतनशील करत गेला.

कमल पाध्ये यांचं हे आत्मकथन म्हणजे भावभावना, नातेसंबंध, त्यातले गुंते, त्यातून निर्माण झालेले ताण, मन मोडणाऱ्या घटना, सुखावणारे अनुभव, आई-मुलातील बंध, मैत्रीचं एक तरल नातं, यांचा कोलाज आहे. कुठेही आवेश नाही. सर्वसाधारणपणे बायकांच्या वाटय़ाला येतो तो अमानुष अन्याय नाही, पण शरीर जसं तुटून पडतं तसं समोरच्याच्या वागण्यानं मन मोडून पडण्याचे अनेक प्रसंग येतात. ते लग्नाच्या सुरूवातीच्या काळातच आले, तर आपलं माणूस म्हणून ज्याला स्वीकारलेलं असतं ते खरंच आपलं आहे का, या प्रश्नाभोवती मन आयुष्यभर रुंजी घालत राहातं. तसंच काहीसं कमलताईंचंही झालेलं आहे.

  प्रभाकर पाध्ये हे मराठीतलं एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व! बुद्धिमान असलेला हा पत्रकार, संपादक, साहित्यिक आणि विचारवंत. सतत साहित्यिक चर्चामध्ये केंद्रस्थानी राहिलेला लेखक. कमलताई या त्यांच्या परिघावर! पण असं परिघावर असणं नाकारून स्वत:ला केंद्रस्थानी आणण्यासाठी आपलं एक वेगळं काम कमलताई सुरू करतात आणि हळूहळू आपलं स्वत:चं आयुष्य सुरू करतात. कमलताईंच्या कथेत त्यांच्या जगण्याचा सारा पट येतो. त्यातली जी विशेष गोष्ट भावते ती त्यांचं स्त्री-पुरुषांतील मैत्रीवरचं चिंतन. स्त्रीपुरुषांतील मैत्री ही कल्पनाच आपल्या समाजाला न पटणारी, न भावणारी. त्यामुळे अनेकदा चोरून केलेली किंवा व्यक्त न करता आल्यानं आपोआप मरूनही गेलेली. खरं तर हे मैत्रीचं नातं इतकं निर्मळ असूनही आजही या मैत्रीकडे संशयानंच पाहिलं जातं. त्याला अनेकदा पुरुष आणि काही अंशी बायकाही कारणीभूत असतात. पन्नास-साठच्या दशकात तर याविषयी पूर्वग्रह मनात ठेवूनच बोललं जात होतं. ठरवून झालेल्या लग्नात अनेकदा विद्वान पुरुषांची बौद्धिक भूक भागत नव्हती. त्या वेळी ‘बौद्धिक मैत्रिणीं’चं नातं साहित्यक्षेत्रात गाजत होतं, असं एका ठिकाणी कमलताईंनी म्हटलंय. त्या म्हणतात, ‘मैत्रीचं नातंच सखोल भावनिक बंधांनी जोडलेलं. मग ते कुठल्याही पातळीवरचं का असेना. त्याला बौद्धिक हे विशेषण कशासाठी आणि मैत्री जर माणसांची भावनिक गरज असेल, तर त्याला कुठल्याही विशेषणांची जरुरीच असायला नको.. आणि या मैत्रिणीचं स्थान कुठलं? आई-बहीण ही नाती निवडता येत नाहीत, ती नाती रक्ताची. पण पत्नी आणि मैत्रीण ही भावनिक बंध निर्माण करणारी, निवडलेली नाती. तशी स्त्रीला पती आणि मित्र निवडण्याची मुभाच समाजानं दिली नाही. पण या सर्व बंधांचं स्वरूप एकाच प्रकारचं. कुणाचंच स्वामित्व न मानणारं आणि तरीही एकमेकांचं स्वामित्व हवंहवंसं वाटणारं. जीवनाचं डायलेक्टिक्स तसं गुंतागुंतीचं.’ या गुंतागुंतीमुळे त्यांच्याही आयुष्यात अनेकदा मन दुखावून जाण्याचे प्रसंग आले. लग्नानंतर रा.भि. जोशी यांच्या पत्नी सुधा जोशी आणि प्रभाकर पाध्ये यांच्यातल्या मैत्रीचं नातं त्यांना लग्न झाल्या दिवसापासून नीटसं कळत नव्हतं. त्यामुळे सुरूवातीच्या काळात हे नातं त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत होतं. पाध्यांचं त्यांना गृहीत धरणं आणि अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करणं या नव्यानं घरात आलेल्या मुलीला कळत नव्हतं. एकदा दोन कॅलेंडर्स घरात घेऊन आलेले पाध्ये ‘तुला हवं ते कॅलेंडर तू आपल्या भिंतीवर लाव’ असं सांगून दुसरं सुधा जोशींना देतात. पण दुसऱ्या दिवशी कमलताईंना आवडलेलं कॅलेंडर सुधा जोशींच्या घरात गेल्याचं पाहून अजूनही या नात्याचे गुंते न कळलेली कमल दुखावते. तिनं पाध्यांना समजून घ्यायला हवं होतं, असं कदाचित वाचकांना वाटू शकतं. पण नवरा-बायकोच्या नात्यात सुरूवातीचे दिवस फार महत्त्वाचे असतात. मनात येणाऱ्या शंकाकुशंका बोलून दाखवणं आणि त्याचा उलगडा करणं दोन्ही बाजूंनी झालं नाही तर हे नातं एखाद्या भोवरीसारखं मनात टोचायला लागतं.

पाध्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. ही मुलगी वटसावित्रीचा उपवास करते हे कळल्यावर पाध्ये कमलताईंना उपवास जबरदस्तीनं मोडून जेवायला लावतात. खरं तर परंपरा, कर्मकांडात वाढलेल्या कमलला हळूहळू समजून घेत तिला बदलवणं त्या काळात पाध्यांना सहज शक्य होतं. पण तसं न करता तिनं काय करावं आणि काय करू नये याचे निर्णय पाध्ये घेत राहिले, ही गोष्ट कमलताईंना अनेकदा अस्वस्थ करत राहिली. लग्नानंतर मनं जुळण्याच्या, एकमेकांविषयी विश्वास आणि प्रेम निर्माण होण्याच्या काळात घडणारे असे अनेक प्रसंग बाईच्या मन तुटण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. पण कमलताई आयुष्यातले असे अनेक छोटे छोटे प्रसंग पचवत, कधी पाध्यांनी केलेल्या प्रेमानं भारावून जात, तर कधी त्यांच्या अलिप्ततेनं दुखावत हळूहळू या अनुबंधात गुंतत जातात. पण नात्याच्या भावबंधात जास्त न अडकता स्वत:ला मोकळं कसं करायचं हेही शिकतात. केवळ समाजकार्य नाही, तर राजकारणातही प्रवेश करतात. पाध्यांना त्यांनी राजकारणात जावं हे मान्य नसताना स्वत: निर्णय घेतात, निवडणुकीला उभ्या राहातात आणि नगरसेवक होतात. ‘राष्ट्र सेवा दला’शी अगदी रामवाडीत असल्यापासून संबंध असलेल्या कमलताई पक्षाच्या राजकारणात सक्रिय होतात. या काळात मधू दंडवते, एस.एम.जोशी, बंडू गोरे, मृणाल गोरे अशा प्रभृतींशी असलेले जिव्हाळय़ाचे संबंध, काही मजेशीर किस्सेही त्यांनी रेखाटले आहेत. कमलताईंनी त्या काळातल्या मृणालताई गोरे यांच्या कामाची केलेली चिकित्सा मुळातून वाचण्यासारखीच आहे. 

स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करताना हिरिरीनं बोलणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांच्या बायका मात्र भाषणं ऐकायला उपस्थित नसायच्या. त्या बहुतेक घरची कामं करत आणि नवऱ्यांची जेवणासाठी वाट पाहात असायच्या, हा विरोधाभास कमलताई त्यांच्या खास शैलीत टिपतात. कार्यकर्त्यांचं महत्त्व विशद करताना त्या लिहितात, ‘कार्यकर्ते हे नेता आणि जनता यांच्यातील दुवा असतात. म्हणून मतांच्या राजकारणात त्यांना महत्त्वाचं स्थान असतं. आपल्या या शक्तीची जाणीव कार्यकर्त्यांना असते. ही शक्ती वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि हितसंबंध, सत्ताभिलाषा यांनी दुभंगली, की हेवेदावे आणि गटबाजी यांचं प्राबल्य होतं. तत्त्वापेक्षा ‘आपला माणूस’ याला महत्त्व येतं आणि या आपल्या माणसाला आपलाच ठेवायची धडपड सुरू होते. त्याची गुंडगिरी, भ्रष्टाचार यावर पांघरूण घातलं जातं. आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे, ‘तोही बदमाश हाही बदमाश. पण हा आपला बदमाश.’

कमलताईंची राजकीय नीतिमत्तेवरची काही भाष्यं आजच्या घडीलाही फार महत्त्वाची आहेत. सत्तेचं राजकारण न करता राजकारण करणाऱ्या, लोकसंग्रह करणाऱ्या, नैतिक अधिष्ठान असलेल्या, हिंसेचा लवलेश नसलेला संघर्ष करणाऱ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या संस्था उभ्या करण्यावर त्यांचा विश्वास बसायला लागला आणि पक्षीय राजकारणातून त्या हळूहळू बाहेर पडल्या. कल्याणकारी कामापेक्षा समाजपरिवर्तनाच्या कामावर त्यांचा ठाम विश्वास होता. धर्माधिष्ठित, जातीयवादी विचारसरणी त्यांना कधीच मानवली नाही. स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करून तिच्या मादी आणि माता या रूपांपेक्षा तिच्या स्वतंत्र व्यक्तित्वाचं दर्शन त्यांना अनुभवायचं होतं. त्यामुळे त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या, प्रशांतच्या मृत्यूनंतर आलेली पोकळी भरून काढण्यासाठी त्या या कामाला वाहून घेतात.  

वेगवेगळय़ा कारणानं कमलताईंच्या आयुष्यात आलेल्या अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या आणि त्यांच्याशी झालेल्या मैत्रीच्या वेगवेगळय़ा कथा आणि छटा त्यांनी या आत्मकथनात चितारल्या आहेत. मैत्रीच्या उबदार स्पर्शाच्या शोधात असलेल्या कमलताईंना त्या मित्रांतले पुरुषही जसे भेटले, तसेच त्यांचं मित्रविश्व उजळवून टाकणारे क्षणही त्यांच्या आयमुष्यात आले. ‘स्त्रीपुरुष मैत्री ही माणसाची भावनामय गरज. अर्धनारी नटेश्वराची कल्पना मला भावते ती या गरजेमुळंच. केवळ नरमादीचं नातं ओलांडून मुक्त आनंद देणारं हे तितक्याच मुक्तपणे जोपासायचं स्वातंत्र्य मात्र माणसांच्या या जगात नाही. म्हणूनच राधाकृष्णाच्या स्नेहाला अलौकिकत्वाच्या पातळीवर बसवून त्याची पूजा करणं एवढंच ती करतात. प्रत्यक्षात तो स्नेह निषिद्धच असतो. हीही या नात्याची एक शोकांतिका आहे’ असं त्यांना वाटतं. 

एकूणच रामवाडी, मुंबई, दिल्ली, पुणे असा सर्वार्थानं समृद्ध करणारा प्रवास आणि त्यामुळे आलेली साहित्यिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक समज आणि समृद्धी अनुभवलेल्या कमलताईंचं आत्मकथन आपल्याला भावनिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध करतं हे मात्र खरं!nrajan20@gmail.com