प्रतिभा जिंतूरकर सर्वप्रथम मी मोबाइल बघितला तो माझ्या भावाकडे. आमच्याकडे त्या काळी लँडलाइन फोन होता. मोबाइल फोनवरून दुसऱ्यांशी बोलता येतं व दुसऱ्यांचं ऐकता येतं आणि कुठेही तो फोन नेता येतो, हे बघून मला आश्चर्यच वाटलं होतं. नंतर माझ्या एका मैत्रिणीकडेही मोबाइल बघितला आणि आपणही मोबाइल घ्यावा असं वाटू लागलं. ..आणि एकदा माझी चांगलीच फजिती झाली! मी एकटीच नागपूर ते नाशिक रेल्वेनं प्रवास करत होते. मी ज्या ट्रेननं येणार होते, ती पहाटे चार वाजता नाशिकला पोहोचणार होती. डिसेंबरची कडाक्याची थंडी. सगळीकडे अंधार. त्यात त्या डब्यात इतर सर्व लोक मुंबईला जाणारे होते, त्यामुळे नाशिक आलं तरी कुणी उठलंच नाही. मलाही जाग आली नाही. नाशिकला माझा मुलगा, तुषार मला घ्यायला स्टेशनवर आला होता. त्यानं आमचा डबा शोधून बाहेरून खूप वेळ डब्याचं दार वाजवलं. पण कुणाला जाग आली नाही. अर्थातच मलाही जाग आली नाही आणि मी पुढे इगतपुरीला निघून गेले. त्या अनुभवानंतर मला प्रकर्षांनं जाणवलं, की आपल्याकडे मोबाइल असता तर मुलानं फोन केला असता आणि मला जाग आली असती. मग मी लगेच ठरवलं, की मोबाइल घ्यायचाच. माझ्या पतीनं मला एक छोटा मोबाइल घेऊन दिला तेव्हा मला खूपच आनंद झाला. त्याचा वापर करून दुसऱ्यांशी बोलायचं कसं, फोन आला तर कसा घ्यायचा, फोटो कसे काढायचे, एवढंच मी शिकले. नंतर ‘स्मार्ट’ मोबाइल आले. मी एक सुंदरसा स्मार्टफोन घेतला. आता हा मोबाइल कुणाकडून शिकावा हा प्रश्न पडला. माझ्या मुलानं थोडंफार मला शिकवलं. आता मात्र माझा नातू निव मला सर्व काही शिकवत असतो. काही प्रश्न पडला तरी तो मला बरोबर सांगतो. कधीही कंटाळा करत नाही. हळूहळू व्हॉट्सअॅप ग्रुप बरेच जमले. त्यावर मेसेज कसे टाकायचे, कुणाचा वाढदिवस असला तर त्याचे फोटो, केकचा फोटो इत्यादी एकत्र करून सुंदर कोलाज कसं तयार करायचं, ते कसं पाठवायचं, त्यावर मेसेज कसा लिहायचा हे मला निवनं शिकवलं. व्हिडीओ शूटिंग मोबाइलवर कसं करायचं, ते दुसऱ्याला कसं पाठवायचं हेही मी शिकले. मला गाण्याची प्रचंड आवड आहे. जुनी हिंदी गाणी, भावगीतं म्हणायला मला फार आवडतं. पण ते ‘कराओके’वर- अर्थात संगीतावर कसं म्हणायचं हे मला काही जमत नव्हतं. नातवाच्या पाठीमागे लागून त्याच्याकडून मी हा ‘कराओके’ प्रकार आणि गाणं म्हणून रेकॉर्ड कसं करायचं ते शिकून घेतलं. ते शिकल्याचा मला खूपच आनंद झाला. अशी रेकॉर्ड केलेली गाणी मी ग्रुप्सवर टाकू लागले. मोबाइलवर टाइप करायला मात्र खूप वेळ लागतो. मला लेख लिहिताना तसं लिहीत बसायचा खूप कंटाळा यायला लागला, तेव्हा मी ‘व्हॉइस टायिपग’ शिकून घेतलं. पण खूप चुका होत होत्या. मी अगदी कंटाळून गेले. म्हटलं, आपण टाइपच करावं. आपल्यापेक्षा लहान मुलांना मोबाइलमधलं सर्व कसं जमतं, आपणही शिकूनच घ्यायचं, असं म्हणून मी जिद्दीनं शिकत गेले. आता भरभर व्हॉइस टायिपग करता येतं. त्याच्या सहाय्यानं मला हवे ते लेख लिहून मी पाठवू शकते. जसजसं नवीन नवीन शिकत गेले, मला आत्मविश्वास वाटत गेला. गूगलवर जाऊन विविध माहिती कशी मिळवायची, फेसबुक कसं ऑपरेट करायचं हेही शिकले. माझी नात आकांक्षा आणि भाचा कौस्तुभ दोघं अमेरिकेला असतात. त्यांच्याशी व्हॉटस्अॅपवर छान बोलता येतं, व्हिडीओवर त्यांना बघता येतं. करोनाकाळात माझ्या पतीचा ७५ वा वाढदिवस आम्ही साजरा केला. तेव्हा ग्रुप मीटिंग घेऊन सर्वाना बघता आलं. मावशी, मामा, भाऊ, बहिणी, सगळय़ांशी गप्पा मारल्या. आता मला कॅब-टॅक्सीसुद्धा बुक करता येते. हे सर्व येण्यामागचं श्रेय मी नातू- निवला देते. अजूनही मी शिकतेच आहे. ऑनलाइन कपडे मागवणं, कुंडीतली झाडं मागवणं, किराणा मागवणं हेही त्याच्याकडून शिकले. नाटक-सिनेमाचं तिकीट ऑनलाइन काढणं आता मला जमतं. निरनिराळे खाद्यपदार्थ कसे बनवायचे हे घरी बसल्या बघता येतं. गावाला कुठे गेलो तर ‘जीपीएस’ लावून पत्ता शोधता येतो. स्टेटस कसं टाकायचं, मेसेज कसे करायचे, डीपी कसा टाकायचा, कॉपी-पेस्ट, बोल्ड अक्षरात कसं लिहायचं, कधी कधी बातम्या ऐकणं, हे सर्व मी आता शिकले आहे. कधी वाचायचा कंटाळा आला, की आरामखुर्चीत डोळे बंद करून बसते आणि मोबाइलवर गोष्टी ऐकण्याचं अॅप वापरून गोष्टी ऐकते. तेव्हा खूप समाधान वाटतं, ‘रीलॅक्स्ड’ वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीचा, आमचा दहावीच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींचा या मोबाइलमुळेच व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केला. माझी जवळजवळ ४३ मित्रमंडळी जानेवारीत नागपूरहून माझ्या घरी नाशिकला आली होती. हे सर्व मोबाइलवरूनच मी ‘अॅरेंज’ केलं याचा मला खूप आनंद झाला. अजूनही काही नवीन दिसलं तर मी लगेच आवडीनं ते शिकून घेते. मला माहीत आहे, नवीन काही येतच राहाणार आहे आणि हा प्रवास सुरूच राहणार..