डॉ. श्रुती पानसे

पुरुषप्रधान संस्कृतीत सातत्यानं दुय्यमतेचा अनुभव घेणाऱ्या, असमानता अनुभवणाऱ्या स्त्रियांच्या विचारक्षमतेवर कसा नकारार्थी परिणाम होतो, हे सिद्ध करणारं एक संशोधन नुकतंच ‘जनरल प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालं. भारतीय संदर्भात हे संशोधन काय चित्र दाखवतं याविषयी नुकत्याच झालेल्या (२६ ऑगस्ट) जागतिक ‘महिला समानता दिना’निमित्तानं..

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

‘‘तुला काय कळतं त्यातलं?’’ हा प्रश्न  साधा वाटला तरी तितका साधा नाही. हा प्रश्न थेट आपल्या मेंदूच्या विकासाशी जोडलेला आहे, असं म्हटलं तर? 

 असा प्रश्न ज्या ज्या स्त्रियांना विचारला गेला आहे, ज्या स्त्रियांना अजूनही विचारला जातो आहे, त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, कारण या साध्या प्रश्नांच्या मागे अनेक छुपे प्रश्न आहेत, अनेक छुपी विधानं आहेत.

  • मला तुझ्यापेक्षा जास्त कळतं. 
  • निर्णय घेऊ नकोस!
  • आमच्या घरात बायका निर्णय घेत नाहीत.   
  • स्वत:ला जास्त शहाणी समजू नकोस.
  • आमची आईपण वडिलांवर अवलंबून असायची. तिने कधी आगाऊपणा करून स्वत: निर्णय घेतला नाही. तर तू का घेते आहेस?..

  ज्या घरात पुरुषप्रधानता असते, ज्या घरात केवळ पुरुषांचं ऐकायचं, अशी मानसिकता आजही आहे, तिथल्या स्त्रियांना अनेकदा अशी विधानं ऐकवली जातात. एकदा नाही, तर अनेकदा. प्रत्येक प्रसंगी. यात जात, धर्म, आर्थिक स्तर आणि कित्येकदा तर शिक्षणसुद्धा मध्ये येत नाही. पुरुष अगदी सहजपणे स्त्रीच्या बुद्धीवर शंका घेऊ शकतो, त्यावर विनोद करू शकतो. व्यंगचित्रातून तिला तसं दाखवू शकतो, अगदी सहजपणे. अर्थातच, या गोष्टी प्रत्येक घरात होत नाहीत. स्त्रियांचं एकूण शिक्षण आणि अर्थार्जनक्षमता यामुळे अनेक घरांत तिचं स्थान वधारलं आहे, हे खरंच आहे. याचबरोबर स्त्रीला मैत्रीण मानणाऱ्या, तिच्या बुद्धीवर विश्वास असणाऱ्या अगणित पुरुषांमुळे ही आता घरोघरची गोष्ट राहिलेली नाही. चित्र नक्कीच बदललं आहे. अनेक घरांत आता समानतेचं वातावरण असतं; पण तरीही अनेक घरांमध्ये तसं नसतंही, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

या विषयावर आता बोलायचं कारण म्हणजे जेव्हा पुरुष स्त्रियांच्या बुद्धीवर अविश्वास दाखवतात, स्वत:चे निर्णयच तिच्यावर लादतात, तेव्हा तिच्या मेंदूवर फारच वाईट होतात, असं संशोधन समोर आलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं केलेल्या एका संशोधनात असं दिसून आलं आहे, की जेव्हा पुरुषप्रधानता असते, सगळे निर्णय पुरुषांकडूनच आणि पुरुषांच्या भूमिकेतून घेतले जातात, तेव्हा स्त्रियांच्या मेंदूतला ‘ग्रे मॅटर’ हा भाग कमी होतो. हे अतिशय महत्त्वाचं संशोधन आहे. ग्रे मॅटर हा भाग माणसाच्या निर्णयक्षमतेशी संबंधित असतो. हा ग्रे मॅटर कमी होतो, असं हे संशोधन सांगतं आहे. हे संशोधन पुरेसं बोलकं आहे, हे खरं; पण वास्तविक असं संशोधन झालं नसतं तरीसुद्धा एखादा पुरुष जेव्हा स्त्रीला सातत्यानं कमी लेखून तिचा अपमान करत असतो, तेव्हा कालांतरानं तिच्यातली निर्णयक्षमता कमी कमी होत जाते, हे स्पष्ट करणारी कित्येक उदाहरणं आपल्याला आसपास दिसत आलेली आहेत. 

या संशोधनात २९ देशांतल्या, १८ ते ३१ या वयोगटातल्या ७८०० व्यक्तींच्या मेंदूंचे एमआरआय स्कॅन करून अभ्यास केला गेला. त्यात स्त्रिया आणि पुरूष होते. यात भारतीय स्त्री-पुरुषाचाही समावेश केला गेला. ज्या देशांमध्ये पुरुषप्रधानता नाही. स्त्रियांना समान स्थान आहे, त्या देशांतल्या स्त्रियांच्या मेंदूत शास्त्रज्ञांना फरक आढळला नाही. मात्र पुरुषप्रधानता असलेल्या देशांत मात्र स्त्रियांच्या उजव्या मेंदूतल्या ‘एंटेरियर सिंग्युलेट गायरस’ आणि ‘ऑर्बिटोफ्रंटल गायरस’ या दोन भागांत फरक आढळला. तिथल्या कोर्टेक्सचा थर जास्त पातळ होता. हे दोन भाग मुख्यत: ताणतणाव आणि भावना यांच्याशी संबंधित होते. या संदर्भात मुख्य संशोधक निकोलस कोर्सी यांनी असं म्हटलं आहे, की स्त्रिया प्रतिकूल सामाजिक प्रभावाखाली राहतात, त्याचाच हा परिणाम आहे.

 हे संशोधन जागतिक पातळीवर झालेलं आहे. मात्र भारतीय संदर्भात आपल्या आसपास काय चित्र आहे हे दाखवणारी ही काही खरीखुरी उदाहरणं –

ल्लनवरा शाळेतल्या मुलांसाठी व्हॅन चालवतो. संसाराला हातभार म्हणून ‘ती’ हे काम वयाच्या पस्तिसाव्या वर्षी शिकली. दोघंही हे काम अनेक वर्ष करतात; पण मुलीच्या लग्नात तिचा नवरा ठरवण्याच्या निर्णयात तिचा (आईचा) सहभाग नव्हता. तसाच मुलीचाही सहभाग नव्हता, हे वेगळं सांगायला नको.   ल्लएम.कॉम. होऊन एका खासगी फर्ममध्ये काम करून व्यवस्थित पैसे कमावणारी एक तरुणी. घरातल्या गुंतवणुकीसंदर्भात तिचा नवरा तिच्याशी चर्चा करत नाही. तो गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतो, परंतु तिला त्या चर्चेत सामील करून घेण्याचंही त्याला सुचत नाही.

ल्लमुलगा हुशार होता, त्याला वेळ दिला तर तो आणखी चांगले गुण मिळवू शकेल, पुढे जाऊ शकेल, म्हणून एका आईनं आपली संपादक पदाची नोकरी सोडली आणि मुलाचा अभ्यास हेच तिनं ध्येय ठरवलं. काही वर्षांनी उत्तम करिअर असलेला, स्वत:च्या पायावर उभा असलेला हा मुलगा आईला सहजपणे म्हणून जातो, ‘‘तुला त्यातलं कळणार नाही, मी बघतो.’’  मुलांना जास्त कळतं, ही आईच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट; पण वाक्याच्या सुरुवातीच्या अध्र्या भागामुळे ती अगदी कसनुशी झाली. तिला आपलं करिअर आठवलं..

अनुभवांच्या मर्यादित कक्षा

मेंदूतल्या न्यूरॉन्स या पेशीचं काम काय असतं? तर ज्या वेळी मेंदू एखादा अनुभव घेईल, त्या वेळी दोन न्यूरॉन पेशी एकमेकांना जुळतात. अशाच पद्धतीने आपण ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे, ज्या गोष्टी वाचल्या आहेत, पाहिल्या आहेत, कोणाकडून ऐकल्या आहेत, त्यांचे न्यूरॉन कनेक्शन तयार होतात. आपलं एकूण व्यक्तिमत्त्व म्हणजेच मेंदूत लहानपणापासून तयार झालेले कनेक्शन्स. स्त्रियांची अनुभवांची कक्षा मर्यादित असली तर सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहिती कमी असलेल्या माणसात आत्मविश्वासाची कमतरता असते, तशी ती त्यांच्यातही असणार. अशी कित्येक उदाहरणं आहेत. असे प्रसंग स्त्रीच्या मनावर   तर आघात करतातच, पण मेंदूवरही करतात. विशेषत: बौद्धिक निर्णय घेत असताना ताण निर्माण करणारी रसायनं निर्माण होत असतील तर गोंधळ उडणारच.

यातली वाईट गोष्ट अशी, की कित्येक स्त्रियांना यात काही वेगळं वाटत नाही. आपल्या बुद्धीवर इथे शंका घेतली जाते आहे, हे तर जाऊ दे, आपल्याला बुद्धी आहे हे जमेला धरणं, हेसुद्धा आसपासची माणसं विसरून गेली आहेत, हेही कित्येकींच्या लक्षात येत नाही, ही त्यातली खरी बाजू. आपण करतोय ते नक्की बरोबर आहे ना, हे समजत नाही, ठामपणा नाही. त्यामुळे आत्मविश्वास नाही. अशा व्यक्तीत न्यूनगंड असणारच, हे काही वेगळं सांगायला नको. इथे मेंदूविकास अडतो. माणूस चुकांतून शिकतो. एखादी चूक हातून झाल्यावर ती सुधारण्याची संधी मिळणं ही आणखी एक गोष्ट आहे. ती संधी मिळत नाही. आणि मेंदूला ती थांबायला लावते.

ज्या कुटुंबातल्या स्त्रियांना खिजगणतीत धरलं जात नाही, त्यांच्यावर विविध प्रकारचे दबाव असतात, त्या प्रत्येक वेळी त्यांच्या मेंदूत ‘कॉर्टीसॉल’सारखी ताणकारक रसायनं निर्माण होतात. ही रक्ताभिसरणाद्वारा संपूर्ण शरीरभर पसरतात आणि अनेक आजार निर्माण करतात. त्यामुळे विविध प्रकारच्या बौद्धिक क्षमता कमी होतात. अशा स्वरूपाच्या घटना ‘आपल्यात’ घडत नाहीत, ‘वेगळय़ा’ लोकांच्यात घडतात, असंही समजायचं काही कारण नाही, कारण ‘ती’ला हसून सगळं काही साजरं करता येतं. तराजूत तोललं तर ‘थप्पड’ चित्रपटातली ती एखादीच असते, ती स्वत:ला कमी लेखण्याला जोरदार विरोध करते. ती एका तागडीत असते. दुसऱ्या बाजूला हसून साजरं करणाऱ्या मोठय़ा प्रमाणात असतात. मात्र इथे प्रश्न आपल्या मेंदूतल्या निसर्गानं दिलेल्या ग्रे मॅटरचा आहे, निर्णयक्षमतेचा आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून ‘आपल्याला काय कळतं?’ हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.         

(लेखिका मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत.)