देशात आणि अनेक राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. मोदी इफेक्टने काँग्रेसला पुरते हैराण करुन सोडले आहे. मागील अनेक वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेस सरकारला अजूनही हा पराभव पचत नसल्याचे दिसते. भाजप रोजगारनिर्मिती, महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याकडे लक्ष न देता घरवापसी आणि गोमाता बचाओ मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे, असा आरोपही काँग्रेसकडून वारंवार होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक विशेष मोहिम राबविली जाणार आहे.

काँग्रेस लवकरच सरकार चालविण्यासाठी पर्यायी मॉडेल उभारेल, असेही काँग्रेसच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले. येणाऱ्या काळात काँग्रेसने भाजपचे पितळ उघडे पाडण्यासाठी एका विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने काँग्रेसने मंगळवारी (१६ मे) या मोहिमेची सुरुवात केली. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत ही मोहिम चालणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले. भाजपने सत्तेत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली असली तरी सत्ताधारी पक्ष म्हणून भाजप देशाच्या सुरक्षेबरोबरच सर्व पातळीवर अपयशी ठरला आहे.

अच्छे दिन येण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या मोदी सरकारने देशातील १२५ कोटी जनतेला असहाय्य बनविले असल्याचा आरोपही कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. देशात असहिष्णुतेचे वातावरण तयार झाले असून, दलितविरोधी वातावरण बनविले जात आहे. सरकारने सत्तेत येताना ‘किमान सरकार आणि कमाल कामकाज’ असा अजेंडा राबविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या उलट परिस्थिती असून प्रत्यक्ष काम न करता शासन सगळीकडे आपली सत्ता गाजवत असल्याचे चित्र आहे. असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.