काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी देशातील गरिबांना किमान उत्पन्नाची हमी दिली आहे. देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. ज्यांचं मासिक उत्पन्न १२ हजारापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. वर्षाला ७२ हजार रुपये गरीब कुटुंबाच्या खात्यात जमा केले जातील अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

आपल्या या निर्णयामुळे देशातील 5 कोटी कुटुंब आणि 25 कोटी लोकांना फायदा होणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. प्रत्येक कुटुंबाचं किमान उत्पन्न १२ हजार रुपये करण्याची योजना असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं आहे. ही योजना जाहीर करण्याआधी सर्व चर्चा आणि गणितं करण्यात आली असून जगात कोणत्याही देशात अशी योजना नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे.

आर्थिकदृष्या कमकुवत घटकाला न्याय देणार असल्याचं सांगताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. जर नरेंद्र मोदी देशातील श्रीमंतांना पैसे देऊ शकतात, तर काँग्रेस गरिबांना पैसे देऊ शकतं नाही का ? असा सवाल यावेळी राहुल गांधी यांनी विचारला.

‘21 व्या शतकात भारतात गरिबी असावी हे आम्हाला मान्यच नाही. मोदींनी श्रीमंतांचा आणि गरिबांचा असे दोन भारत निर्माण केले आहेत. पण आम्ही एकच भारत निर्माण करणार आहोत’, असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. देशाला गरिबीतून बाहेर काढणार आहे. मला गरिबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यांचाही आदर झाला पाहिजे असंही राहुल गांधींनी म्हटलं.