ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

या अगोदर एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलेलं आहे.

“१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं धार्मिक तेढ निर्माण करणारं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यामुळे आता पक्ष परवानगी देत नाही तो पर्यंत वारीस पठाण हे कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

काय म्हणाले होते वारीस पठाण?
सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य  केले होते.