देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचा फिवर सरु आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये मतदानासाठी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी पश्चिम बंगालमधील एका हलवायाने अनोखी शक्कल लढवली आहे. या आपल्या शक्कलीमुळे त्याला चांगला आर्थिक फायदाही होत आहे.


हावडा येथील एका मिठाईच्या दुकानाचे मालक प्रदीप हलदर यांनी ही शक्कल लढवली आहे. आपल्या दुकानात विविध प्रकारच्या मिठायांवर विविध राजकीय पक्षांची चिन्हे त्यांनी साकारली आहे. लोकांनी योग्य उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी माझा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रयत्नामुळे मला चांगला आर्थिक फायदाही होत असल्याचे त्यांनी सांगितले, लोकांनाही ही शक्कल आवडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. सात टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.