फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. एवढंच नाही तर या समितीने असाही दावा केला आहे की भारतात करोनाच्या केसेस या १ कोटी ६ लाखांपेक्षा जास्त वाढणार नाहीत.

सध्याच्या घडीला भारतात करोनाग्रस्तांची एकूण संख्या ७५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र त्यापैकी ६५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान मोदी सरकारने मार्च महिन्यात देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली असंही या समितीने म्हटलं आहे.

सरकारच्या वैज्ञानिकांच्या समितीचे प्रमुख सल्लागार के. विजयराघवन यांनी या समितीची स्थापना केली आहे. या समितीने आणखी एक दावा केला आहे की जर मोदी सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउन लागू केला नसता तर देशभरात करोनामुळे २५ लाख लोकांचे प्राण गेले असते.

करोनाची दुसरी लाट?
कोविड एक्स्पर्ट पॅनलचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन आठवड्यांपासून करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र थंडीच्या दिवसांमध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. करोनाचा प्रतिबंध करणारी लस आल्यानंतर ती नागरिकांना उपलब्ध करुन देता येईल. भारतात करोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती बरीच चांगली आहे. तरीही भारताला या सगळ्या करोनाच्या प्रवासात मोठा पल्ला गाठायचा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.