काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन परदेशी गुंतवणुकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने अर्थात एनएनडीएलने गोठवल्याची माहिती समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्याच्या शेअरचे भाव कोसळले होते. त्यातच मुंबई विमानतळाची मालकी अदानी समूहाकडे देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या दोन्ही मु्द्द्यांवरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. महुआ मोईत्रा यांनी एक ट्विट करत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यात अदानी समूहांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई विमानतळाची मालकी आणि अदानी समूहामध्ये भागधारकाबद्दलचा मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. "दोन आठवडे झाले आहेत आणि अजूनही हे कळलेलं नाही की, अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारी व्यक्ती कोण होती. मुंबई विमानतळाकडून सिक्युरिटी क्लिअरन्सही मिळालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयालाही माहिती आहे की, कोण भागधारक कोण आहे. देशाला जाणून घ्यायचं की, अदानींच्या कंपन्यांमध्ये कोण पैसा गुंतवत आहे," असा सवाल महुआ मोईत्रा यांनी केला आहे. 2 weeks & we still don’t know whose money in Adani cos. Security clearance imperative to takeover Mumbai airport. If so, Home Ministry clearly knows who owns shares. Nation would certainly like to know. Maybe GoI will only answer in Parliament. — Mahua Moitra (@MahuaMoitra) June 27, 2021 हेही वाचा- अदानी ग्रुपमधील कोणत्या कंपन्यांवर झाला होता परिणाम? अदानी समूहातील काही कंपन्यांच्या समभागांची मालकी असलेल्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठविली असल्याचे वृत्तानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना २५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे समूहाच्या बाजार भांडवलाला एका दिवसात तब्बल ५४ हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता. अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागातील अग्रणी भागधारकांपैकी तीन परदेशी गुंतवणूकदार फंडांची खाती गोठविली गेलेली नाहीत आणि या संदर्भातील वृत्त ‘चुकीचे आणि दिशाभूल करणारे’ आहे, असा समूहाकाडून लेखी खुलासा केला गेल्यानंतर अदानी समूहातील सहा कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात सावरले होते.