पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर चुकीचं वर्तन केल्याचं कारण देत स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरावर इंडिगोनं सहा महिन्यांची, तर एअर इंडियानं अनिश्चित काळासाठी बंदी घातली. या कंपन्यांनंतर आणखी दोन हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी बंदी घातली आहे. स्पाईस जेट आणि गो एअर या कंपन्यांच्या प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
“इंडिगोच्या विमानात कुणाल कामरानं केलेली वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत त्याच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात येत आहे,” असं सांगत एअर इंडियानं त्यांच्यावर बंदी घातली. त्याचबरोबर इंडिगोनंही कुणाल कामरावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. विमानातील त्यांची वर्तणूक स्वीकारार्ह नाही, त्यामुळे सहा महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, कंपनीनं ट्वीटरद्वारे दिली होती. “अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्यात येऊ नये. यामुळे आपल्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असं इंडिगोनं स्पष्ट केलं होतं.
आणखी वाचा – अर्णब गोस्वामींशी गैरवर्तन भोवलं; कुणाल कामराला एअर इंडिया, इंडिगोतून हवाई प्रवासास बंदी
कुणाल कामरानं अर्णब गोस्वामी यांच्याबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी हवाई वाहतूक करण्याऱ्या कंपन्यांना त्याच्यावर बंधनं घालण्याची सूचना निर्देश केली होती. “एखाद्या व्यक्तीला त्रास होईल आणि त्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशी विमानात केलेली वर्तणूक स्वीकारली जाऊ शकत नाही. यामुळे विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. आमच्याकडे इतर विमान कंपन्यांना संबंधित व्यक्तीवर काही बंधन घालण्याचा सल्ला देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,” असं त्यांनी ट्विट करून म्हटलं होतं. त्यानंतर आता स्पाईस जेट आणि गो एअर या कंपन्यांनी कुणाल कामरावर बंदी घातली आहे.
I did this for my hero…
I did it for Rohit pic.twitter.com/aMSdiTanHo
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 28, 2020
आणखी वाचा – Social Viral: जेव्हा अर्णब गोस्वामींना कुणाल कामरा विमानात भिडतो…
काय आहे प्रकरण?
अर्णब गोस्वामी आणि कुणाल कामरा एकाच विमानातून प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामरानं गोस्वामी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्याने ट्विटही केलं होतं. “मी लखनौच्या विमानात अर्णब गोस्वामी यांना भेटलो. त्यांना मी नम्रतेनं बोलण्याची विनंती केली. पहिल्यांदा त्यांनी फोनवर बोलत असल्याचं नाटक केलं. मी त्यांचा फोन संपण्याची वाट पाहिली,” असं कुणाल कामरानं आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.