लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानंतर पुढे मोदी सरकार काय करणार? कसं करणार? असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही सहभाग आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला आहे.

देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सगळ्या दिवसांमध्ये काँग्रेस शासित राज्यांची स्थिती नेमकी काय आहे? तिथे करोनाचे रुग्ण किती आहेत? काय काय उपाय योजण्यात आले आहेत याबाबत आज सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्या चर्चेदरम्यान त्यांनी लॉकडाउननंतर म्हणजेच १७ मे नंतर काय करणार मोदी सरकार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- देशातील करोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या उंबरठ्यावर; आतापर्यंत १६९४ जणांचा झाला मृत्यू

दरम्यान लॉकडाउन ३ नंतर म्हणजेच १७ मेनंतर मोदी सरकार काय निर्णय घेणार ? लॉकडाउनसाठीचे नेमके काय निकष १७ मेनंतर असतील असेही प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले आहेत.

पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं कौतुक

पंजाब आणि हरयाणा या राज्यातील शेतकऱ्यांचे मी आभार मानते कारण त्यांनी अनेक अडचणींचा सामना करुन गव्हाचं पिक घेतलं त्यामुळे देशाला गव्हाची कमतरता भासणार नाही असंही सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्याचं समजतं आहे.