द्रविड मुन्नेत्र कळघमने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर बुधवारी त्या पक्षाच्या पाच मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे सादर केले.
एम. के. अलागिरी, डी. नेपोलियन, एस. गांधीसेल्व्हन, एस. एस. पलानिमनिकम आणि एस. जगतरक्षकन या केंद्रीय मंत्र्यांनी बुधवारी दुपारी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामे सादर केले. यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला विचारात न घेतल्यामुळे अलागिरी पक्षाचे प्रमुख आणि वडील एम. करुणानिधी यांच्यावर नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजीनामा देतानाही सुरुवातीला गांधीसेल्व्हन, पलानिमनिकम आणि जगतरक्षकन यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर सुमारे एक तासाने अलागिरी व नेपोलियन स्वतंत्रपणे पंतप्रधानांना भेटले आणि त्यांनी आपले राजीनामे दिले.
श्रीलंकेतील तामिळ नागरिकांच्या मुद्द्यावरून द्रमुकने यूपीए सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. द्रमुकचे लोकसभेमध्ये १८ सदस्य आहेत.