दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागला ही दुर्देवी बाब असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. पण राजीनामा दिल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला फायदा होईल आणि दिल्लीतील फेरनिवडणूकीत ‘आप’ला पूर्ण बहुमतही मिळू शकते, असा विश्वासही अण्णा हजारेंनी व्यक्त केला आहे. तसेच आपले 17 मुद्दे मान्य केले तर ‘आप’च्या प्रचाराला जाण्याची तयारी अण्णा हजारेंनी दर्शविली आहे. याशिवाय केजरीवालांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा विचार करु, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. जनलोकपाल विधेयकाला काँग्रेस आणि भाजपने विरोध करणे दुर्देवी आहे. पण राजकारणात कधीही काहीही घडते, कधी गळ्यात गळा घालून फिरणारे कधी एकमेकांच्या तंगड्या ओढतील हे सांगता येत नाही, असे सांगत अण्णांनी राजकारण्यांना टोला हाणला आहे. त्यामुळे जनलोकपालप्रश्नी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे अण्णा केजरीवाल यांच्याबाबत सकारात्मक होताना दिसत आहेत.