जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे कलम ३७० हटवणे हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. कलम ३७० रद्द करणे हे एक ऐतिहासिक पाऊल असून, त्यामुळे जम्मू-काश्मीर संपूर्ण भारताशी जोडले जाणार आहे.

या निर्णयामुळे पश्चिमेकडच्या शेजाऱ्यांच्या ज्या योजना आहेत, त्यावर परिणाम झाला आहे असे नरवणे म्हणाले. त्यांचा रोख पाकिस्तानकडे होता. पाच ऑगस्टला संसदेने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले व त्या राज्याचे जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. भारताच्या या निर्णयावर पाकिस्तानने बरीच आदळआपट केली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशच त्यांच्या पदरी पडले.

युद्धाबद्दल काय म्हणाले लष्करप्रमुख ?
भारताचे नवनियुक्त लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला आहे. दहशतवाद अजिबात सहन करणार नाही तसेच भविष्यात कुठलेही युद्ध लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले.

“भारतीय लष्कर नेहमीच सतर्क असते. आमचे जागतिक घडामोडींवर लक्ष आहे. दहशतवाद आणि शेजारी देशातून होणारी घुसखोरी खपवून न घेण्याच्या धोरणावर आम्ही ठाम आहेत” असे नरवणे म्हणाले. दहशतवादाचा सामना करण्यासाठी अनेक पर्याय आहेत तसेच कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे नरवणे म्हणाले.