भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये काही गोष्टींमध्ये साम्य आहे. नेहरु आणि वाजपेयी हे देशाचे पंतप्रधानपद भूषवणारे त्यांच्या पक्षाचे पहिले नेते आहेत. आपल्या वकृत्वाने समोरच्याला जिंकून घेणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांची क्षमता नेहरुंनी सुरुवातीलाच ओळखली होती व एकदिवस वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होतील असे भाकित वर्तवले होते.

राजकारणात येण्यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पत्रकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या राष्ट्र धर्म या वर्तमानपत्रासाठी ते काम करायचे. वाजपेयी बलरामपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्येच वाजपेयींनी आपल्या कामाने संसदेत छाप उमटवली. लोकसभेत वाजपेयी जे प्रश्न उपस्थित करायचे, भाषणे द्यायचे त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरुंचे त्यांनी लक्ष वेधून घेतले.

पंडित नेहरु वाजपेयींच्या हिंदी वकृत्वाने इतके प्रभावित झाले कि, १९५७ साली त्यांनी एकदिवस वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होतील असे भाकित वर्तवले होते. नेहरु परदेशी पाहुण्यांबरोबर वाजपेयींची भविष्यातील पंतप्रधान अशी ओळख करुन द्यायचे. नेहरुंचे हे भाकित ४० वर्षांनी ९० च्या दशकात प्रत्यक्षात आले व वाजपेयी १९९६ साली पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.

वाजपेयींनाही नेहरुंबद्दल प्रचंड आदर होता. १९७७ साली वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा देशाचे परराष्ट्रमंत्री झाले तेव्हा त्यांनी नेहरुंनी त्यांच्याबद्दल पंतप्रधानपदाचे जे भाकित केले होते त्याची एकप्रकारे परतफेड केली. केंद्रात जनता पार्टीचे सरकार आले होते. वाजपेयी परराष्ट्रमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार होते.

नोकरशहांनी वाजपेयींच्या कार्यालयातून काँग्रेसची ओळख सांगणाऱ्या सर्व गोष्टी हटवल्या. वाजपेयी कार्यालयात आले तेव्हा त्यांना भिंतीवर एक जागा रिकामी दिसली. त्यांनी त्यांच्या सचिवाला सांगितले कि, इथे पंडितजींचा फोटो होता. मी याआधी या रुममध्ये आलो त्यावेळी हा फोटो तिथे होता. तो फोटो कुठे गेला? मला तो फोटो इथे हवा आहे? असे वाजपेयींनी सांगितल्याची आठवण प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितली. पंडित जवाहरलाल नेहरुंनी सर्वाधिक काळ तब्बल २४ वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषवले.