केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका वेबिनारमध्ये बोलताना ‘आत्मनिर्भर भारत’ साकार करण्यासाठी काय आवश्यक आहे, त्याची माहिती दिली. “आत्मनिर्भर भारतामध्ये एमएसएमईचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. आयात कमी करुन, निर्यात वाढवणे. त्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा आवश्यक आहेत. उत्पादनाच्या पॅकेजिंगमध्ये सुधारणा करुन चांगल्या पद्धतीने ते उत्पादन सादर करणे एमएसएमईसाठी महत्त्वाचे आहे” असे नितीन गडकरी म्हणाले.

“आत्मनिर्भर भारत हे मोदींचे मिशन आहे. आम्ही १०० लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे ठरवले आहे. इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इथेनॉल, बायोफ्युल, बायोसीएनजीवर काम करत आहोत. क्रूड ऑईलची आयात नक्कीच कमी करु” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक सॉफ्टेवेअर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीवर जोर दिला आहे. मेड इन इंडिया, मेक इन इंडियाला प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.

“ज्ञान आणि वेस्ट या दोन गोष्टींना संपत्ती निर्मितीमध्ये बदलणे आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक आहे” असे नितीन गडकरींनी सांगितले. “जीडीपी, निर्यात वाढली पाहिजे, आयात कमी झाली पाहिजे, ते मोदींचे मिशन आहे. आम्ही त्यावर मेहनत घेतोय” असे गडकरी म्हणाले. अनेक एमएसएमई चीनकडून होणाऱ्या आयतीवर अवलंबून आहेत. पण त्यावर आता मर्यादा आल्या आहेत, या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, “ऑटोमोबाइल आणि अन्य सेक्टर्सच्या अडचणीवर तोडगा काढलाय. प्रत्येक देशाची धोरण असतात” असे त्यांनी सांगितले. “एमएसएमई सेक्टर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये एमएसएमईचा ३० टक्के वाटा आहे. ४८ टक्के निर्यात एमएसएमईमधून होते. या क्षेत्राने ११ कोटी नोकऱ्या तयार केल्या आहेत” त्यामुळे हे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचे गडकरींनी सांगितले.