राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘दहशतवादी संघटना’ घोषित करून या संघटनेवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी करून समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी रविवारी नव्या वादाला जन्म दिला. संघाने दंगलींचे नियोजन करून त्या घडवून आणल्याच्या खान यांच्या आरोपावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
संघाने अनेक दंगली घडवून आणल्या असून आणखी बऱ्याच आखल्या आहेत. त्यामुळे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, असे खान पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अयोध्येत त्याच जागेवर बाबरी मशीद बांधली गेली, तर भारतातील मुसलमान भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी ग्वाही आम्ही भाजप व संघाला देतो, असे त्यांनी राम मंदिराच्या मुद्दय़ावर बोलताना सांगितले.
हा केवळ धार्मिक तणाव वाढवण्याचा, एका विशिष्ट समुदायाला खूश करण्याचा आणि उत्तर प्रदेश सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे सचिव श्रीकांत शर्मा यांनी केला.