काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपा आणि बजरंग दलावर हे आयएसआयकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने द्विग्विजय सिंह यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ”बजरंग दल व भाजपवाले आयएसआयकडून पैसे घेत आहेत, याकडे थोडे लक्ष द्यावे. तसेच, पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी मुस्लीमांपेक्षा जास्त गैरमुस्लीमच करत आहेत.” असे द्विग्विजय सिंह म्हणत असल्याचे दिसत आहे.

याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सरकावर टीका करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था खराब होत आहे, सरकार देखील हे म्हणत आहे की देशाचा जीडीपी घसरत आहे. परिस्थिती अशी आहे की रिझर्व बँकेकेडून पैसे घ्यावे लागत आहे, मात्र पंतप्रधान मोदींना ‘फिट इंडिया’ची चिंता आहे. त्यांनी यावेळी सांगतले की, फिट इंडिया असायला हवा मात्र येथे कुपोषण आहे. गरिबी, महागाई, अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा हवा आहे. मध्य प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत बोलताना ते म्हणाले की, ज्या दिवशी सोनिया गांधी याबाबत निर्णय घेतील, त्या दिवशी प्रदेशाध्यक्ष निश्चित होईल. सध्या तरी कमलनाथ हेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

या अगोदरही दिग्विजय सिंह यांनी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर, केवळ घोषणांनी काय होत? जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे पंतप्रधान मोदींबरोबर मैत्री निभावत असतील तर दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हाफिज सईद यांना तत्काळ भारताकड सोपवायला हवे, असे म्हटले होते.