दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लिखित माफीनाम्यामुळे फक्त त्यांच्या अडचणी वाढलेल्या नसून, पक्षात रणसंग्राम सुरु झाला आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्याविरोधात अमली पदार्थांच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतल्यानंतर शुक्रवारी भगवंत मान यांनी पंजाब आम आदमी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे, आम आदमी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवण्यात आल्याने नाराज असलेल्या कुमार विश्वास यांनी शेलक्या शब्दांत टीका केली आहे. कुमार विश्वास यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘उस पर क्या थूंकें, जो खुद थूक चाटने में में माहिर हो’. याशिवाय पक्षातील अन्य दोन खासदारांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. कंवर सिंह संधू आणि सुखपाल सिंह खैरा यांनी केजरीवालांवर टीका करताना त्यांनी लोकांना नाराज केलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मागितलेल्या लिखीत माफीमुळे ते नाराज आहेत. केजरीवाल यांनी नेमकं असं का केलं हे ते समजू शकलेले नाहीत.

अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंजाबचे महसूल मंत्री विक्रमसिंग मजिठिया यांची माफी मागितली. पंजाब विधानसभा निवडणुकीत अमली पदार्थाचा मुद्दा महत्वाचा ठरला होता. या निवडणुकीच्या प्रचारावेळी मजिठिया यांचा अमली पदार्थाच्या व्यवहारात हात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मे २०१६ मध्ये मजिठिया यांनी केजरीवाल आणि आपच्या अन्य दोघांविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. खोटे आरोप करुन केजरीवाल आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत असा आरोप मजिठिया यांनी केला होता.

मात्र केजरीवाल यांनी विक्रमसिंग मजिठिया यांची लेखी माफी मागितली आहे. अलीकडे मी तुमच्यावर तुम्ही ड्रग व्यवसायात सहभागी असल्याचे आरोप केले होते. माझी विधाने राजकीय हेतुने प्रेरित होती. या आरोपातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. या मुद्यांवरुन पुन्हा राजकारण नको असे केजरीवाल यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. मी तुमच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो आणि माफी मागतो असे केजरीवालांनी त्यांच्या निवेदनात म्हटले. माफीनाम्यानंतर मजिठिया यांनीही खटला मागे घेतला आहे.

खासदार कंवर संधू बोलले आहेत की, ‘केजरीवाल यांच्या माफीनाम्यामुळे लोक निराश झाले आहेत. खासकरुन पंजाबमधील जनता नाराज आहे. जर तुम्ही सत्यासोबत आहात तर मग अब्रुनुकसानीच्या दाव्याला घाबरण्याची गरज नाही. मीदेखील एका प्रकरणाला सामोरं जात असून अखेरपर्यंत लढणार’.

‘मी केजरीवाल यांच्या माफी मागण्याच्या वेळेमुळे हैराण आहे. त्यांनी अशावेळी माफी मागितली आहे जेव्हा एसटीएफ आणि उच्च न्यायालयाला ठोस पुरावे असल्याचं सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयामुळे नाराज आहोत’, असं आमदार सुखपाल सिंह बोलले आहेत.