बिहारमधील जनता यंदा दोन वेळा दिवाळी साजरी करेल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शुक्रवारी व्यक्त केला. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज मोदींची बिहारमधील बंका येथे पहिली जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असताना मोदींनी बिहारमधील जनता दिवाळी सण साजरा करेलच पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही येथील जनता दिवाळी सणासारखाच आनंद साजरा करेल, असे मोदी म्हणाले.

देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचे असेल तर बिहारचा विकास महत्त्वाचे असल्याचाही पुनरुच्चार मोदींनी यावेळी केला. नितीश कुमार सरकारवरही मोदींनी शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी लगावला. तसेच बिहारमध्ये विभाजन, जातीय राजकारण अशा असंख्य समस्या सोडविण्याऐवजी त्यांना खतपाणी घालण्याचे काम सत्ताधाऱयांकडून होत असल्याचाही आरोप मोदींनी केला. येथील जनता आता सुजाण असून अमेरिका दौऱयात देखील बिहारमधील काहींशी तेथे भेट झाली. त्यांनी साध्य केलेले यश पाहून मला आनंद झाला. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता, असेही मोदी पुढे म्हणाले. जातीय राजकारण आणि विभाजनाला झुगारून येथील जनतेने विकासाठी मतदान करावे, असे आवाहनही मोदींनी केले.