भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या तणावाचं वातावरण असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जींच्या पक्षावर टीका केली आहे. पश्चिम बंगालमधील एका आयोजित प्रचारसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगाल सरकार अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी राजकीय खेळी करत असल्याचा आरोप केला आहे.

‘संपुर्ण देशात दुर्गा पुजा आणि मोहरम एकाच दिवशी असतं. उत्तर प्रदेशात अधिकाऱ्यांनी मला पुजेची वेळ बदलावी का ? अशी विचारणा केली. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, पुजेची वेळ अजिबात बदलली जाणार नाही. तुम्हाला बदलायचीच असेल तर मोहरमच्या मिरवणुकीची वेळ बदला’, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

याआधी आलेल्या रिपोर्टनुसार, पश्चिम बंगाल पोलिसांनी राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभांना परवानगी दिली नव्हती. भाजपाने दावा केली आहे, कोलकातामधील फुल बगान परिसरात मंचाची तोडफोड करण्यात आल्याने योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा रद्द करण्यात आली. प्रचारसभा डेकोरेटरला मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना बंगालमधील सर्व तीन सभांना हजर राहा, अजिबात माघार घेऊ नका अशी सूचना केली आहे.