तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले. मागच्या आठवडयात चीनच्या इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले. मागच्या काही वर्षातील अशा प्रकारची करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

इंग्लिशमध्ये असलेले हे नकाशे अनहुई प्रांतातील एका चिनी कंपनीने बनवले होते. अरुणाचल प्रदेशवर चीन पूर्वीपासून दावा करत आला आहे. अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटला हिस्सा मानतो.

सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या शेडोंग प्रांतातील किंगदाओ शहरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा मारुन ८०० बॉक्स जप्त केले. त्यामध्ये २८,९०८ जागतिक नकाशे होते. जप्त केलेले साहित्य गुप्त ठिकाणी नेऊन नष्ट करण्यात आले. पूर्व चीनमधील अनहुई प्रांतातील कंपनीने हे नकाशे बनवले होते. हे नकाशे परदेशात पाठवण्यात येणार होते असे ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.