पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर काठावर गेल्या ४८ तासांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) मोठय़ा प्रमाणात सैन्याची जमवाजमव केली असून, भारतानेही तिथे मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या का वक्तव्याचा संदर्भ देत सरकारला टोला लगावला आहे. चीन आपली जमीन घेत आहे आणि पुन्हा ती ताब्यात घेण्यासाठी आपल्या सरकारकडे मात्र काहीच योजना नाहीय असा टोला राहुल यांनी ट्विटरवरुन लगावला आहे.

“चीनने आपल्या भूभागावर मिळवलेला ताबा सुद्धा अ‍ॅक्ट ऑफ गॉड आहे का? चीनने आपली जमीन घेतली आहे. सरकारकडे ही जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची काही योजना आहे का? की याला पण आता अ‍ॅक्ट ऑफ गॉडच म्हणायचं?,” असे ट्विट राहुल यांनी केलं आहे.


नक्की वाचा >>
 Act of God म्हणजे काय?, GST परिषदेनंतर सारा देश शोधत होता अर्थ, महाराष्ट्र यादीत अव्वल

निर्मला नेमकं काय म्हणाल्या होत्या?

२७ ऑगस्ट रोजी झालेल्या वस्तू व सेवा कर परिषदेमध्ये निर्मला सितारामन यांनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना अ‍ॅक्ट ऑफ गॉडचा उल्लेख केला होता. करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ (अ‍ॅक्ट ऑफ गॉड) असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असे सांगत सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे सांगितले होते. या वक्तव्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर आणि केंद्राच्या आर्थिक धोरणांवर टीका केल्याचे पहायाला मिळालं होतं.

नक्की वाचा >> ‘देवाच्या करणी’मुळे केंद्र हतबल… ‘मोदी तर विष्णूचा ११ वा अवतार’; महाराष्ट्रातील नेत्याचं ‘ते’ ट्विट व्हायरल

अ‍ॅक्ट ऑफ गॉडचा अर्थ काय?

अ‍ॅक्ट ऑफ गॉड ही टर्म प्रामुख्याने विम्यासंदर्भात वापरली जाते. तसेच कायदेशीर बाबींमध्येही ही वापरली जाते. ढोबळपणे या टर्मचा अर्थ सांगायाचा झाल्यास एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेसाठी कोणालाच जबाबदार धरता येत नाही. ती घटना घडून जाणे हे निर्सगामुळे होतं आणि त्याला कोणीच काही करु शकत नाही असं सांगण्यासाठी अ‍ॅक्ट ऑफ गॉडचा वापर करतात. याचवरुन बॉलिवूडमध्येही ओ माय गॉड नावाचा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता.

नक्की वाचा >> नकारात्मक जीडीपी पाहून विरोधकही म्हणाले, “पटलं बुवा, #ModiHaiToMumkinHai’

भारत-चीन सीमेवर परिस्थिती काय?

चिनी सैन्य मेपासून फिंगर ४ पर्वतरांगांजवळ तळ ठाकून आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठापासून ते ‘रेझांग ला’ जवळच्या ‘रचिन ला’पर्यंतच्या मार्गावरील उंच ठिकाणांवर भारतीय लष्कराने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणांवर ताबा मिळविण्याचा आता चीनचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. चीनने संपूर्ण सैन्यमाघारीची तयारी दर्शवली होती. मात्र, चिनी सैन्याने फिंगर ४ पर्वतरांगांतून कधीच माघार घेतलेली नसून, त्यांनी या पर्वतरांगांच्या वरील भागात सुमारे २ हजार सैनिकांची जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्याच्या हालचाली लक्षात घेऊन भारतीय लष्करानेही मोठय़ा प्रमाणात जवान तैनात केले आहेत. तेथील परिस्थिती तणावपूर्ण असून, दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान फक्त ४००-५०० मीटरचे अंतर असल्याचे सूत्रांनी सांगितले.