देशात सामूहिक संसर्ग झाला आहे पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सर्वत्र पसरलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ‘संडे संवाद’ या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात ते बोलत होते. भारत कम्युनिटी संसर्गापर्यंत येऊन ठेपल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले. जगभरात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊन ती चार कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर ११ लाखांहून अधिक लोकांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. भारतात बाधितांचा आकडा ७४.९४ लाखांच्या पार गेला आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “वैश्विक महामारी असलेल्या कोविड-१९ आजाराचा काही जिल्ह्यांमध्ये सामूहिक संसर्ग सुरु झाला आहे. मात्र, सध्या तो संपूर्ण देशात होत नाहीए.” संडे संवाद या कार्यक्रमात त्यांना एकानं प्रश्न विचारला की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात सामूहिक संसर्ग झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्येही तो होत आहे का? यावर उत्तर देताना डॉ. हर्षवर्धन यांनी मान्य केलं की, दाट लोकसंख्या असलेल्या भागात करोना विषाणूचा सामूहिक संसर्ग होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालसहित अनेक राज्यांच्या विविध भागांमध्ये सामूहिक संसर्गाची माहिती मिळाली आहे. मात्र, हे देशभरात होत नाहीए. हे अनेक राज्यांच्या काही जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित आहे. देशात करोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य मंत्र्यांनी याच्या सामूहिक संसर्गाची गोष्ट मान्य केली आहे. यापूर्वी ते कायमच या गोष्टीचा इन्कार करत होते.

या आठवड्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या लोकांकडून आगामी दुर्गा पूजेच्या काळात सावधानता बाळगण्याचे आवाहन केले होते. ममतांनी म्हटलं होत की, मी सर्वांशी उत्सवांच्या काळात कोविड-१९ सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा आग्रह करत आहे. कारण राज्यात कोविड-१९ च्या सामुहिक संसर्गाची उदाहरणंही सापडली आहेत.

दुसरीकडे जुलै महिन्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली होती. ज्यामध्ये नकळत ही गोष्ट समोर आली की भारतात एप्रिलच्या सुरुवातीला सामुहिक संसर्ग झाला होता. त्यानंतर याबाबतची कागदपत्रं आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरुन काढून टाकण्यात आली होती.