अहंकारामुळे भाजपाचं सरकार गेलं असल्याची टीका काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला आघाडी मिळाली असून भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर अशोक गहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

अहंकारामुळे भाजपाचं सरकार गेलं आहे. भाजपाकडे निवडणूक लढण्यासाठी साधा मुद्दाही नव्हता. काँग्रेसमुक्तीची भाषा करणारेच मुक्त होतील असा टोला अशोक गहलोत यांनी लगावला आहे. निकालांमुळे भाजपाच्या गर्वाचा पराभव झाला असल्याची टीका करताना सत्तेत आल्यानंतर विरोधकांना सोबत घेऊन काम करु असंही ते म्हणाले आहेत.

काँग्रेसने लोकांचा कल जिंकला आहे. आकडे कमी जास्त होतील, पण लोकांची काँग्रेसलाच पसंती आहे. आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आहे, मात्र तरीही अपक्ष उमेदवार आणि भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षांची इच्छा असेल तर आम्हाला समर्थन देऊ शकतात असं अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.