जम्मू-काश्मीर विधानसभेत भरघोस मतदानानंतर आता त्रिशंकू अवस्थेमुळे सलग तिसऱ्या दिवशी सरकार कोणाचे हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष यांच्यातील बोलणी सकारात्मक निर्णायक ठरू शकली नसून आता नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांच्यातच छुपा समझोता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसला १२ जागा मिळाल्या असल्या तरीही सत्तास्थापनेमध्ये ते कोणती भूमिका घेतात, यावरही अनेक समीकरणे अवलंबून आहेत.
८७ सदस्य असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीला २८ तर भाजपला २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारा ४४ हा आकडा गाठायचा तर, या दोन पक्षांसाठी ते सहजशक्य आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली बोलणी फिरत्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्दय़ावर रखडली आहेत. भाजपला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्यास पीडीपी अनुकूल नाही.
उलटपक्षी १२ आमदार असलेल्या काँग्रेसशी आघाडी करायची आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या १५ आमदारांचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा असा पीडीपीचा प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. राज्यात निवडून आलेल्या अपक्ष आमदारांनीसुद्धा पीडीपीने भाजपसह न जाता नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या नेत्यांमध्येही कोणाला पाठिंबा द्यावा किंवा कोणाचा पाठिंबा घ्यावा यावरून मतभेद आहेत.
नॅशनल कॉन्फरन्ससह न जाता अपक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा केला जावा, अशी काही नेत्यांची मागणी आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सलमान निझामी यांनीही ‘भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे’ सांगितले. पीडीपीच्या नेत्यांच्या तसेच ६ अपक्ष आमदारांच्या संपर्कात काँग्रेस पक्ष असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपमध्येही चर्चेची गुऱ्हाळे सुरू
राज्यातील सर्व घटकांशी सध्या चर्चा केली जात आहे. अखंडत्त्व, विकास आणि स्थिर सरकार या मुद्दय़ांबाबत संबंधितांची मते काय आहेत, हे आजमावून पाहत आहोत, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांशी माधव यांनी बोलणी केली.

मुफ्ती मोहंमद सईद मोदीभेटीला?
मुफ्ती मोहंमद सईद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत जाणार असल्याचे वृत्त पसरले होते, मात्र सध्या तरी असे काही होण्याची शक्यता नाही, असे माधव यांनी स्पष्ट केले.
भाजपला देशभरात आपल्याला हवे असलेले ‘राजकीय मॉडेल’ लादायचे आहे, अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. मात्र राज्याचे हितसंबंध आणि अखंडत्व यांच्या रक्षणासाठी हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत, असे आवाहनही माकपने केले आहे.

पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहेत वाजपेयी यांच्या कार्यकाळात तर नॅशनल कॉन्फरन्स हे तत्कालीन एनडीए सरकारमधील घटकपक्षही होते. राज्यात स्थिर आणि विश्वासार्ह सरकार देण्यास प्राधान्य आहे.
राम माधव, भाजप सरचिटणीस