भारतात करोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतात आता करोनाग्रस्तांची संख्या २० लाख ६ हजार ७६० इतकी झाली आहे. भारत आता ब्राझिलच्या मागोमाग आहे. ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त करोना रुग्ण आहेत. तर अमेरिकेत ५० लाखांपेक्षा जास्त करोना रुग्णांची संख्या असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब आहे, असं ते म्हणाले.

“करोनाबाधितांच्या संख्येनं २० लाखांचा टप्पा पार केला आहे. परंतु मोदी सरकार गायब आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीही त्यांनी करोनाच्या प्रादुर्भावावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी यापू्वी एक ट्विट करत १० ऑगस्टपूर्वी देशातील करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. तसंच यासाठी सरकारला ठोस उपाययोजना करायला हव्या असंही त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- मोठी बातमी… पहिल्यांदाच एका दिवसातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांच्या पुढे

आणखी वाचा- भारतात करोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० लाखांचा टप्पा

जगात ज्या देशांमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत त्यात भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.