मोदी सरकार काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत असून एकेकाळी जम्मू काश्मीर देशाची ताकद होती. पण आता हे राज्य देशाची कमकुवत बाजू झाली आहे अशी टीका काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी यांनी केली.

डीएमके अध्यक्ष करुणानिधी यांच्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त राहुल गांधी रविवारी चेन्नईत आले होते. याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काश्मीरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला. काही महिन्यांपूर्वी मला संरक्षण मंत्री अरुण जेटली भेटले होते. त्यावेळी मी त्यांना जम्मू काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात सावधानतेचा इशारा दिला होता. केंद्र सरकारने काश्मीरला संकटात ढकलले आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे मी जेटलींना सांगितले होते असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पण जेटलींनी काश्मीरमध्ये शांतता असल्याचा दावा केल्याचे गांधींनी सांगितले. मोदी सरकार त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे देशात समस्या निर्माण करत असून काश्मीरचा वापर फक्त राजकारणासाठी होत असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. काश्मीर हे राज्य एकेकाळी भारताची ताकद होती. पण आता हे राज्य भारताची कमकुवत बाजू झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

डीएमके अध्यक्ष करुणानिधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षांची एकजूटही दिसून आली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याच्या दिशेने हा पहिला प्रयत्न असल्याचे दिसते. राहुल गांधी यांनी यासंदर्भातही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि समान विचारधारा असलेले पक्ष संघ आणि मोदी यांना त्यांचे विचार देशावर लादू देणार नाही असे त्यांनी सांगितले. एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील जनतेच्या आवाजाची गळचेपी होऊ देणार नाही असे ते म्हणालेत. करुणानिधी यांच्या सन्मानानिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, कम्यूनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचूरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आदी नेतेमंडळी उपस्थित होती.