पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवरुन संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही केल्या. लॉकडाउन संपल्यानंतरच्या नियोजनाबाबत त्यांनी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. सध्या देशात सुरु असलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. लॉकडाउन संपल्यानंतर लगेच रस्त्यावर गर्दी होणार नाही. याची काळजी घ्यावी. २१ दिवसानंतर रस्त्यावर पुन्हा गर्दी होणार नाही, यासाठी रणनितीची गरज असल्याचे मोदी म्हणाले.

“लॉकडाऊन संपल्यानंतर १५ एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचे नियोजन प्रत्येक राज्याने करावे. टप्प्या-टप्प्याने लोक, वसाहती, भाग सुरु होतील हे पाहावे असे मोदी म्हणाले. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमकी कशा प्रकारे राज्य सरकारांनी परिस्थिती ठेवावी याविषयी अन्य राज्यांचे मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन मागितले.

यावर पंतप्रधानांनी “राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्या-टप्प्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या”.

“देशात आतापर्यंत आपण कोरोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते. पण खऱ्या अर्थाने आता लढाई सुरु झाली आहे. लॉकडाऊन संपले म्हणजे झाले नाही. आपल्याला सोशल डिस्टेनसिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचे पर्यटन ठेवणे महत्वाचे आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असे नाही तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका” असे मोदी यांनी सांगितले.