करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला देशातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासोबत सोमवारपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाउन वाढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र यावेळी त्यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली नव्हती. १७ मे रोजी यासंबंधी माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कॅबिनेट सचिव रात्री ९ वाजता सर्व राज्यांच्या मुख्य सचिव तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. यावेळी लॉकडाउन ४ च्या नियमावलीसंबंधी चर्चा होणार असून त्यानंतर ती जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान केंद्राने घोषणा करण्याआधीच राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. महाराष्ट्रासोबत तामिळनाडू सरकारनेही ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केलेली आहे.

लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना राज्य सरकारने इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. तोपर्यंत आधीचे नियम कायम राहणार आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे”.