योगगुरू रामदेव बाबा यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने करोना सात दिवसांत पूर्णपणे बरा करणारे पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा मंगळवारी केला. मात्र, त्यानंतर आयुष मंत्रालयाने तातडीने जारी केलेल्या आदेशाद्वारे पतंजलीला या औषधाची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली. ‘आयुष’ने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला असून, जोवर त्याची पडताळणी होत नाही, तोवर ही बंदी कायम राहणार आहे. यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही,” असं आचार्य बालकृष्ण म्हणाले.

आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. “निम्स विद्यापीठ जयपूर येथे करोना पॉझिटिव्ह रूग्णांवर श्वासारी वटी आणि अणु तेलासोबत अश्वगंधा, गिलोय घनवटी, तुलसी घनवटीपासून तयार केलेल्या औषधांची ठराविक यशस्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर २३ जून २०२० रोजी या चाचणीचे निकाल सार्वजनिक करण्यात आले. त्यानं अश्वगंधा, गिलोय, तुळशी या तीन मुख्य औषधी वनस्पतींच्या घनतेचे संतुलित मिश्रण असलेल्या करोनिल या औषधाची पतंजलीने कायद्यानुसार नोंद केली,” अशी माहिती त्यांनी दिली.
“पतंजलीनं करोनासाठी वैद्यकीय चाचणी पूर्ण होण्यापूर्वी कोरोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही. सीटीआरआय नोंदणीकृत वैद्यकीय चाचणीच्या विषयात कोणत्याही प्रकारच्या वादाचा प्रश्न नाही. सर्वांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एकत्रितरित्या विश्वासानं पुढे यायला हवं,” असंही आचार्य बालकृष्ण म्हणाले.

करोनिल या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठी पतंजलीने किती नमुन्यांची तपासणी केली, हे वैद्यकीय प्रयोग कोणत्या ठिकाणी झाले, कोणत्या रुग्णालयांत हे संशोधन झाले, त्यासाठी संस्थात्मक तत्त्व समितीने परवानगी दिली होती काय, याचा तपशील पतंजलीकडे मागण्यात आला आहे, असे आयुषतर्फे सांगण्यात आलं होतं.

हरिद्वारमध्ये पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले की, पतंजलीचे करोना संच ५४५ रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या करोना संचामध्ये ३० दिवस पुरेल इतके औषध असेल. करोनाचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणूनही या संचाचा वापर करता येऊ शकतो, असा दावाही पतंजलीने केला होता. हरिद्वारस्थित दिव्या फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लि. यांनी औषधांचे उत्पादन केले आहे. पतंजली संशोधन संस्था आणि जयपूरस्थित राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून औषध तयार करण्यात आलं आहे, असे रामदेवबाबा यांनी सांगितलं होतं.

रामदेवबाबांचा दावा..

करोना किटमध्ये कोरोनील, श्वसरी आणि अणु तेल या तीन औषधांचा समावेश आहे. ही औषधे प्रतिकारशक्ती वाढविणारी नाहीत तर करोना पूर्णपणे बरा करणारी आहेत. करोनाबाधित २८० रुग्णांवर या औषधांचा प्रयोग करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के रुग्ण तीन दिवसांत बरे झाले. हे औषध घेतल्यावर सात दिवसांत रुग्ण पूर्ण करोनामुक्त होतो, असा दावा रामदेवबाबांनी केला होता.