रविवारपासून ईशान्य दिल्लीत सुरु असलेला हिंसाचार आता थांबला असून या भागातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, या हिंसाचारामधील मृतांचा आकडा आता ३४वर पोहोचला आहे. यांपैकी दोघांचे मृतदेह एका नाल्यामध्ये सापडले आहेत. दरम्यान, प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत किंवा नाहीत यावर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

आणखी वाचा – दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण : मायावती

दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या खटल्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एम. के. आचार्य, अमित महाजन आणि रजत नायर यांना दिल्ली पोलिसांचे वकील म्हणून नियुक्त केले आहे.
केजरीवालांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारासंबंधी एक उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, कैलाश गहलोत आणि इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये हिंसाचारग्रस्त भागातील लोकांना दिलासा देण्याबाबत चर्चा होणार आहे.

आणखी वाचा – दिल्लीतल्या हिंसाचारावर मनमोहन सिंग म्हणाले…

हिंसाचाराकडे केंद्र सरकारी डोळेझाक – सोनिया गांधी

दुसरीकडे काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग देखील त्यांच्यासोबत होते. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, दिल्लीत तीन दिवस हिंसाचार सुरु होता याकडे केंद्र सरकार डोळेझाक केली.