आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपा नेत्या उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणावरून विरोधकांनी भाजपासह निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं होतं. विशेषतः निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या कारणावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतील आहे. ज्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन आढळून आले होते. त्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी गुरुवारी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदान झाल्यानंतर एका खासगी गाडीत नागरिकांना ईव्हीएम मशीन सापडली. ही गाडी त्याच मतदारसंघातील भाजपा उमेदवाराची असल्याचं नंतर समोर आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भाजपासह निवडणूक आयोगावर टीका करत कारवाई करण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा- गदारोळ! भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

या प्रकाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना निलंबित केलं असून, सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर निवडणूक आयोगाने वास्तविक अहवाल प्रसिद्ध केला आहे. “राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक १४९ वर १ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता दुर्दैवी घटना घडली. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एका वाहनाची मदत घेतली. वाहनाच्या मालकाबद्दल कोणतीही चौकशी न करता ईव्हीएम आणि इतर साहित्यासह त्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसह भाजपा उमेदवाराच्या पत्नीच्या गाडीतून प्रवास केला. ईव्हीएम मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र, करीमगंजमधील या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात येईल,” असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

आणखी वाचा- क्या स्क्रिप्ट है?; निवडणूक आयोगाच्या खुलाशावर प्रियंका गांधी भडकल्या

प्रियंका गांधींनी केले होते सवाल?

“क्या स्क्रिप्ट है?” असं म्हणत प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं आहे. “निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजपा उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम म्हणायचं का?,” असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला होता.